नवीन सदस्यांना संधी देण्याच्या हालचाली
पालघर : सव्वा वर्षांच्या कार्यकाळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी या उद्देशाने तसेच या आशयाचे सूत्र निवडीपूर्वी ठरल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, बांधकाम सभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबरीने जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती यांनी आपल्या राजीनामा देण्याच्या तयारीत असून वाडा पंचायत समितीच्या सभापतींनी देखील राजीनामा सादर केला आहे. पालघर व मोखाडा या तालुक्यात शिवसेनेमधील तर विक्रमगड व डहाणू येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या सभापती पदाकरिता नवीन सदस्यांना संधी देण्याची हालचाली सुरू आहेत.
पालघर जिल्ह्यच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी गेल्या आठवडय़ात पक्षाच्या नेत्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाला राज्य मंत्रीपद दर्जा असल्याने त्यांचा राजीनामा कोकण आयुक्त यांच्या कार्यालयात समक्ष सादर करणे आवश्यक होते. कोकण आयुक्त निवृत्त झाल्यानंतर सध्या त्यांच्या पदाचा कार्यभाग ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे असून भारती कामडी यांनी मोजक्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत ७ जुलै रोजी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ चौधरी यांनी यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेकडे सादर केला असून शिवसेना पक्षाचे वाडय़ाचे सभापती यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. समाज कल्याण सभापती बहुजन विकास आघाडीचे विष्णू कडव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असता हा राजीनामा विहित नमुन्यात नसल्याने पुन्हा नव्याने सादर करण्याचे सांगण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
यापूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणावर निवडून आलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती निलेश सांबरे, महिला बाल कल्याण सभापती अनुष्का ठाकरे तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापती सुशील सुरी यांची पद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रिक्त झाली होती. नव्या घडामोडी पाहता जिल्हा परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांची पदक रिक्त झाली असून या पदांकरिता लवकरच निवडणूक घेतली जाईल असे संकेत मिळत आहेत.
सध्या असलेल्या ४२ जिल्हा परिषद सदस्यांपैकी शिवसेनेचे १५ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, बहुजन विकास आघाडीचे चार सदस्य आहेत. त्यामुळे सत्तास्थानी असलेल्या तीन पक्षांच्या सदस्य संख्या पाहता महाआघाडी तर्फे सुचवण्यात येणाऱ्या उमेदवारांची विजय सहजगत होईल अशी शक्यता आहे. वाडा येथील राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेले उपसभापती यांनी राजीनामा देऊन या पदावर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेय. वाडा पंच्यात समितीचे सभापती पद शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा अंतर्गत समजूतदार झाल्याचे सूत्रांकडून समजते. पालघर व मोखाडा पंच्यात समिती मध्ये शिवसेनेचे तर विक्रमगड व डहाणू येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असून या चारही पंचायत समितीमध्ये पक्षाअंतर्गत नवीन चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळावी यादृष्टीने विद्यमान सभापतींची राजीनामे पक्षीय पदाधिकारी घेण्याच्या तयारीत आहेत. यापैकी काही सभापतींचे राजीनामे प्राप्त झाले असले तरीसुद्धा ते जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले नाहीत. पालघर मधील ओबीसी आरक्षणाच्या जागांवर निवडून आलेल्या १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती जागा रिक्त असून या रिक्त पदांसाठीची निवडणूक करोना पार्श्वभूमीवर लांबणीवर पडली आहे. तरी देखील विविध पंचायत समितीचे सभापतीपद, जिल्हा परिषदेचे विषय सभापती व अध्यक्ष— उपाध्यक्ष या पदांसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल अशी चिन्हे दिसू लागली असल्याने जिल्ह्यत राजकीय वारे वाहू लागले आहेत.