सोलापूर : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भाजप व संघ परिवाराने देशभर राममय वातावरण निर्माण केले असताना याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी असंघटित कामगारांच्या रे नगर योजनेअंतर्गत घरांच्या चाव्या देण्यासाठी आले. या शासकीय कार्यक्रमात त्यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सूरही आळवला. त्यातून जनसमुदायाकडून वारंवार देण्यात आलेल्या जय श्रीरामच्या घोषणा आणि 'मोदी-मोदी'चा धोशा, भाजपने केलेले मोठे शक्तिप्रदर्शन आणि प्रभाव पाहता आगामी लोकसभा निवडणुकांसाठी 'हिंदू मतपेढी' अधिक भक्कम होण्यास मदत झाल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता असंघटित कामगारांचा रे नगर योजनेचा गृहप्रकल्प साकार होण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही तब्बल १४ वर्षे संघर्ष, पाठपुरावा केला. या महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पाचे खरे शिल्पकार आर्थात आडम मास्तर हेच ठरतात. परंतु त्यांच्या लाल बावट्याच्या काठीचा वापर भाजपचे झेंडे फडकावण्यासाठी पद्धतशीरपणे झाला. संपूर्ण कार्यक्रमावर भाजपचा ठळकपणे दिसलेला प्रभाव आणि जाणीवपूर्वक झालेले शक्तिप्रदर्शन लक्षात घेता मूळ माकपच्या आडम मास्तरांनी घडवून आणलेल्या या कार्यक्रमाचे भाजपने ताबा घेतल्याचे चित्र होते. याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सूर वारंवार आळवताना आणि जनसमुदायाच्या भावनेला हात घालत केलेल्या भाषणात 'मोदी हीच गॅरंटी' असल्याचा पुनःपुन्हा उल्लेख केला खरा; परंतु कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसह सोलापूरच्या विकासाचे प्रश्न तसेच वाऱ्यावर सोडले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी भाजपसाठी 'मतांची गॅरंटी' भक्कम करताना कामगारांच्या प्रश्न सोडवणुकीसह सोलापूरच्या विकासासाठी यापूर्वी दिलेल्या 'गॅरंटी'चाही विसर पडल्याचे दिसून आले. हेही वाचा - लाटेच्या विरोधात जाणारा रायगड यंदा कोणाला कौल देणार ? मोदी हे गेल्या दहा वर्षांत तीनवेळा सोलापुरात आले होते. यापूर्वी त्यांनी सोलापुरात टेक्स्टाईल हब बनविणे, लष्करातील सैनिकांसाठी सोलापुरातून गणवेश तयार करून घेणे आदी आश्वासने देऊन टाळ्या मिळविल्या होत्या. परंतु आता त्यांनी या आश्वासनांचा साधा उल्लेख न करता सोलापूरकरांचा अपेक्षाभंग केला आहे. रे नगर योजनेच्या लाभार्थी कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अनुदान, गृहप्रकल्पस्थळी सौरऊर्जा प्रकल्प उभारून घरांना मोफत वीज द्यावी, असंघटित निवृत्त कामगारांना दरमहा दहा हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉरसाठी बार्शी ते अक्कलकोट दरम्यान भूसंपादन करताना त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना कर्नाटकच्या धर्तीवर मोबदला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी आडम मास्तरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समक्ष पंतप्रधान मोदी यांना साकडे घातले असता त्यावर त्यांनी भाषणात अवाक्षरही न काढता कामगारांच्या प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. यापेक्षा मोदी यांचा भाषणात संपूर्ण भार श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना, 'मोदी गॅरंटी' आणि विरोधकांवर आसूड यावरच होता. १० हजार महिला विडी कामगारांच्या घरकुल योजनेपाठोपाठ प्रदीर्घ संघर्ष करून मोठ्या चिकाटीने तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी रे नगर योजनेबाबत माकपचे आडम मास्तर यांनी पुढाकार घेतला. परंतु त्याचे श्रेय आडम मास्तरांना द्यायचेच नाही, याची पुरेपूर खबरदारी मोदी यांनी घेतली. उलट, आडम हे पाच वर्षांत शरीराने खूप जाड झाले, असा शेरा मारला. ही बाब सोलापूरकरांना आवडली नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेली टिप्पणी बोलकी आहे. ५०-५५ वर्षांच्या कामगार चळवळीच्या जोरावर तीनवेळा आमदार झालेले आणि विधानसभेतही कामगारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले गेलेल्या आडम मास्तरांनी कामगारांसाठी संघर्षाच्या लढाईबरोबरच रचनात्मक कामासाठीही लढाई केली आहे. त्यांच्याच पुढाकाराने २० वर्षांपूर्वी शासनाच्या मदतीने दहा हजार महिला विडी कामगारांसाठी आशिया खंडात सर्वात मोठ्या गोदूताई परूळेकर घरकुल वसाहतीची उभारणी केली होती. २००४ साली या घरकुलांच्या चाव्या देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. विडी कामगारांपेक्षा घरेलू कामगार, यंत्रमाग, शिलाई कामगार, काचकचरा वेचक, रंगारी अशा असंघटित कामगारांची आर्थिक स्थिती अधिक दयनीय असल्यामुळे त्यांच्यासाठी आडम मास्तर यांनी तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी गृहप्रकल्पाचा संकल्प केला. त्यासाठी सलग १४ वर्षे शासन दरबारी चिकाटीने पाठपुरावा केला, मोर्चे, धरणे, निदर्शने आदी माध्यमातून रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष केला. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. काही हितसंबंधी बड्या नेत्यांनी आडकाठी आणली होती. तर काही पुढाऱ्यांनी आडम मास्तर कामगारांना घरांचे स्वप्न दाखवून दिशाभूल करतात, अशा वावड्याही उडविल्या होत्या. एवढेच नव्हे तर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही काही सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी 'देशमुखी' थाटात घरांच्या योजनेची खिल्ली उडविली होती. हेही वाचा - राहुल गांधी यांना आसामच्या मंदिरात प्रवेश नाकारण्याचे कारण काय? जाणून घ्या.. चिकाटीने आडम मास्तर यांनी भगिरथ प्रयत्नांनी रे नगर योजनेचे (राजीव आवास योजना, सध्याची प्रधानमंत्री आवास योजना) महत्वाकांक्षी गृहप्रकल्प साकार केला. त्यासाठी आर्थातच राज्य व केंद्र शासनाला हातभार लावावा लागला. आडम मास्तरांचा कामगारांसाठीच्या घरांसाठी १४ वर्षांचा वनवास संपला आहे. मात्र असंघटित कामगारांच्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी यांनी बगल दिल्यामुळे आडम यांनी नाराजी व्यक्त करीत त्यासाठी संघर्ष करण्यास तयार असल्याचे सांगितले.