उमाकांत देशपांडेमुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असला आणि सभा विराट होत असल्या तरी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर जरांगे यांचे नेतृत्व हळूहळू संपुष्टात येईल, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाची राजकीय झळ भाजपला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसणार नाही, असा भाजप पक्षश्रेष्ठींना विश्वास आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीत अधिकाधिक कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र देण्याचे काम केले जात आहे. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासून आरक्षणाची शिफारस करणे आणि सरकारकडून विधिमंडळात विधेयक सादर करून कायदा करणे, हे शक्य होणार नाही. त्यामुळे जरांगेकडून अधिक मुदत मिळविण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जाणार आहेत. हेही वाचा. ‘बीआरएस’ विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार, पक्षनोंदणीचा २ कोटीचा टप्पा लवकरच पार करणार मात्र सध्या जरांगे राज्यभरात आरक्षणासाठी जनजागृती करीत मोठ्या सभा घेत आहेत आणि सरकारने मुदतीत आरक्षण न दिल्यास पुढील आंदोलन उभारण्यासाठी समाजाची बांधणी करीत आहेत. याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींकडून जनमानसाचा कौल व स्थानिक पातळीवरील परिस्थिती अजमावली जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला राजकीय फटका बसणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी सरकारमधील उच्चपदस्थांना दिल्या आहेत. हेही वाचा. गुर्जरांच्या नाराजीचा भाजपला फायदा? भाजपने छत्रपती उदयनराजे, संभाजी राजे यांच्यासह राज्यातील प्रतिष्ठित घराण्यांमधील नेत्यांना आपल्याबरोबर घेतले, तरी त्यांच्यामागे समाजाचा पूर्ण पाठिंबा नाही. जरांगे यांचे नेतृत्व मराठा समाजातील अन्य नेतृत्वांना आव्हान देत असून त्याबाबतच्या परिणामांचा भाजपचे नेते अभ्यास करीत आहेत. सामाजिक चळवळ, आरक्षण आणि अन्य प्रश्नांमधून निर्माण झालेले नेतृत्व हे तात्कालिक असते, ते कारण संपल्यावर ओसरते, हा देशातील अनुभव आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनातून पुढे आलेले नेते कन्हैय्याकुमार यांच्यासह राममंदिर आंदोलनात पुढे आलेले नेते आज कुठे आहेत.? आंदोलनाची हवा असताना या नेत्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा असतो, त्या काळात नेतृत्व फुगते व भरकटतेही, मात्र आंदोलनाचे कारण संपल्यावर ते नेतृत्व लयास जाते. मराठा समाजाला आरक्षण दिल्यावर जरांगे यांच्याबाबतही तसेच होईल, असे भाजपमधील उच्चपदस्थाने ' लोकसत्ता ' ला सांगितले. हेही वाचा. Telangana Polls : इंदिरा गांधींच्या काळात कुपोषणामुळे मृत्यू, नक्षलवादाचा उदय; केसीआर यांची काँग्रेसवर टीका आगामी निवडणुकांआधी आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल. तो पुढे न्यायालयीन कचाट्यात सापडला, तरी भाजपला राजकीय फटका बसणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.