अकोला : जातीय समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात अकोला जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अकोला व वाशीम जिल्ह्याला अपवाद वगळता मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना गृहीत धरण्याची पक्षाची परंपरा अबाधित राहिली. दोन्ही जिल्ह्यांच्या नशिबी पुन्हा पार्सल पालकमंत्री येणार असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अकोला व वाशीम शासन दरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिलेले जिल्हे. या भागातील प्रश्न, समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंत्रिपदाचाही सातत्याने दुष्काळच राहिला. दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मतदारांना भाजपसह प्रमुख राजकीय पक्षांकडून कायम गृहीत धरण्यात येते. लोकप्रतिनिधींना मंत्रिपद देण्यात प्राधान्याने विचार होतांना दिसत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यातील डॉ. रणजीत पाटील यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली होती. त्यानंतर २०१९ पासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. मध्यंतरी सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा फोल ठरली. जिल्ह्याला मंत्रिपदाने कायम हुलकावणी दिली आहे.

हे ही वाचा… विदर्भातील सात जिल्हे मंत्रिपदापासून वंचित, काही जिल्ह्याला तीन तर काहींना एकही नाही, असंतुलित वाटपाने नाराजी

आता पश्चिम वऱ्हाडात एकमेव मंत्रिपद खामगावचे आकाश फुंडकर यांना मिळाले. मंत्रिमंडळात जातीय समीकरण राखण्याच्या दृष्टीने कुणबी समाजाचे आकाश फुंडकर यांना कॅबिनेट पदाची लॉटरी लागल्याचे बोलल्या जात आहे. विधानसभा निवडणुकीत अकोला, वाशीम जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. त्यातील अनेक आमदारांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली, तर काहींनी विजयाचा चौकार देखील लगावला आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मंत्रिपदासाठी अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. आ.सावरकरांनी हॅट्ट्रिकचा इतिहास करण्यासोबतच ५० हजार ६१३ मताधिक्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचितचा चितपट केले. लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाचा बालेकिल्ला कायम राखण्यात आ.सावरकरांचा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभेत अकोट व मूर्तिजापूरची जागा निवडून आणण्यात देखील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत. मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार अशी आशा होती. मात्र, मंत्रिपदावर त्यांना संधी मिळाली नाही. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सलग विजयाचा चौकार लगावला. अकोट मतदारसंघात विजयी होण्याची प्रकाश भारसाकळेंनी हॅट्ट्रिक केली. मंत्रिपदासाठी पिंपळे व भारसाकळे यांच्या नावांची सुद्धा चर्चा होती. मात्र, त्यांची देखील निराशा झाली. वाशीम जिल्ह्यातील भाजपचे दोन्ही आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे वाशीम जिल्ह्याला भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाची शक्यता नव्हतीच. अकोला व वाशीम जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने भाजपांतर्गत देखील नाराजीचे वातावरण आहे.

हे ही वाचा… नवनिर्वाचित तिन्ही मंत्री यवतमाळचा मागास शिक्का पुसतील!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यांवर पालकत्व

मविआ सरकारमध्ये तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदाची जबाबदारी घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकत्व असल्याने अकोल्याला ते फारसे वेळ देऊ शकले नव्हते. पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कामकाज सांभाळले. आता सुद्धा अकोला व वाशीम जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांवरच जिल्ह्यांचे पालकत्व येणार आहे.