पुणे : बारामतीतील राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेलला २१ पैकी २० जागा मिळाल्याने बारामतीत अजित पवारांचीच ‘दादागिरी’ चालते, हे या निकालाने स्पष्ट झाले. राजकीय डावपेच आणि मतांसाठी ‘सर्वकाही’ करण्यात आल्याने विरोधी पॅनल निष्प्रभ ठरली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंगीत तालीम असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनलचे नेतृत्त्व करणारे युवा नेते युगेंद्र पवार यांना विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा अपयश आले.
या निवडणुकीत कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अजित पवार यांनी स्वत:चेच नाव जाहीर केले होते. त्यामुळे ही निवडणूक अजित पवार यांंच्यादृष्टीने प्रतिष्ठेची झाली होती. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पॅनलही निवडणुकीत उतरल्याने लोकसभा आणि विधानसभेनंतर बारामतीत तिसऱ्यांदा दोन्ही ‘राष्ट्रवादी’त झुंज झाली. मात्र, अजित पवार यांनी अनुभव पणाला लावून कारखान्यावरील सत्ता कायम राखली.
अजित पवार यांच्या नेतृत्वाचा कस लावणारी आणि युगेंद्र पवार यांच्या उभरत्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी ही निवडणूक होती. मात्र, राजकीय डावपेच आणि मतांसाठी अजित पवार यांच्या पॅनेलकडून ‘सर्वकाही’ करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा निभाव लागला नसल्याचेे निकालावरून दिसून आले आहे.
बारामतीतील राजकारणाच्या दृष्टीने माळेगाव सहकारी साखर कारखाना हा महत्त्वाचा मानला जातो. आजवर या कारखान्यावर पवार कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या कारखान्याच्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप नेते, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलने अजित पवार यांच्या पॅनलला धक्का देऊन कारखान्याची सत्ता हस्तगत केली होती.
मात्र, २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या ताब्यातील कारखाना काबीज केला. यावेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल असल्याने अजित पवार यांना ताकत लावावी लागली. चंद्रराव तावरे यांना मतदारांनी साथ दिली. मात्र, रंजनकुमार तावरे यांना पराभव पत्करावा लागला. या मतदारांनी अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या हाती एकहाती सत्ता दिली.
अजित पवारांनी ‘ब’ गट का निवडला?
अजित पवार यांनी या निवडणुकीत ‘ब’ गटातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत ‘ब’ गटातील मतदार हे ऊस उत्पादक शेतकरी नसतात. त्याऐवजी विविध सहकारी संस्था आणि उत्पादक संस्था म्हणजे दूध संघ, पतसंस्था, पणन संस्था यांचे प्रतिनिधी असतात. हे प्रतिनिधी संबधित संस्थांच्या वतीने मतदान करतात. या संस्था अजित पवार यांच्या साथीदारांच्या ताब्यात असल्याने अजित पवार यांनी हा गट निवडला होता. या गटात १०२ मतदार होते, ज्यापैकी १०१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये अजित पवार यांना ९१ मते मिळाली.
बँकेत ‘रात्रीस खेळ चाले…’
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती शाखा रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने या निवडणुकीतील वातावरण तापले होते. विरोधी पॅनलने त्यावरून अजित पवार यांना ‘लक्ष्य’ करून आरोपांच्या फैरी झाडल्या. पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावरून टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यामुळे अजित पवार यांच्या हे प्रकरण अंगलट येणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, या प्रकरणाचा फारसा परिणाम निकालावर झाला नसल्याचे स्पष्ट झाले.