Ajit Pawar vs Sharad Pawar in Baramati : बारामतीतील राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) रिंगणात उतरली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:चाच उमेदवारी अर्ज दाखल करून नवा डाव टाकला आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा राजकीय सामना रंगला आहे. शेतीप्रधान असलेल्या बारामती तालुक्यात सध्या मान्सूनच्या आगमनाची कमी, तर मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २२ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीचीच जास्त चर्चा आहे.
बारामतीच्या कामेश्वर गावातील ऊस उत्पादक शेतकरी किरण खांडे सांगतात, “सुमारे ४० वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बारामतीत चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ‘दादा’ (अजित पवार) रिंगणात असतील तर नाट्यमय घडामोडी तर ठरलेल्याच असतात, ही लढत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी नाही.”
अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनेल
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वत: संचालकपदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री नीलकंठेश्वर पॅनेल’ने आपले २१ उमेदवार जाहीर केले आहेत. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’चे २१ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे बारामतीच्या पारंपरिक पवार गडावर आता काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष उभा ठाकलेला दिसत आहे.
आणखी वाचा : Maharashtra Politics : राज्यात हिंदी सक्तीचा वाद पुन्हा का उफाळून आलाय? नव्या शासन निर्णयात नेमकं काय?
१९८४ नंतर पहिल्यांदाच अजित पवार रिंगणात
- १९८४ नंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
- याआधी अजित पवारांनी इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती.
- सहकारी साखर कारखान्यांमधूनच राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली, त्यापैकी अजित पवार हेही एक नेते आहेत.
- अजित पवार यांनी मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘निलकंठेश्वर पॅनेल’ उभे केले आहे.
- तर शरद पवार यांच्या ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’चं नेतृत्व त्यांचे पणतू युगेंद्र पवार करीत आहेत.
- विशेष म्हणजे, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झाली होती.
- बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी युगेद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता.
साखर कारखान्यावर पवार कुटुंबियांचीच सत्ता
मालेगाव सहकारी साखर कारखान्यावर दीर्घकाळापासून पवार कुटुंबाची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगल्यानंतर अजित पवार हे संपूर्ण सहकारी संस्थांवर प्रभाव ठेवून होते. २०१९ मध्ये मालेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र आता त्याच मंडळातील अनेकांचा झुकाव शरद पवारांकडे असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

२० हजार शेतकरी करणार मतदान
मालेगाव सहकारी कारखान्याची कार्यक्षेत्र सुमारे ३७ गावांपर्यंत पसरलेलं आहे. २० हजार सभासद शेतकरी या निवडणुकीत मतदान करणार आहेत. हे सभासद कारखान्याचे भागधारकही आहेत. सभासद शेतकऱ्यांना उत्कृष्ट मोबदला देणारा कारखाना म्हणून मालेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. विशेष बाब म्हणजे, या निवडणुकीत भाजपा नेत्यानेही आपलं स्वतंत्र पॅनल उभं केलं आहे. २०२९ मध्ये भाजपात प्रवेश करणारे चंद्रराव तावरे हे पवार कुटुंबियांचे जुने विरोधक आहेत. त्यांनीही या निवडणुकीत ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ उभं केलं आहे. याशिवाय स्वतंत्र उमेदवारांचे एक पॅनेलही निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे ही चौरंगी निवडणूक होणार आहे.
शरद पवारांचे राजकीय डावपेच
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांची अचानक भेट घेतली, त्यावेळी ही भेट चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार पराभूत झाल्या असल्या तरी तावरे कुटुंबाने पहिल्यांदाच अजित पवारांच्या गटाला मतदान केल्याचं उघडपणे मान्य केलं. या पार्श्वभूमीवर, अजित पवार हे महायुतीतील घटकपक्षाचे नेते असूनही ते तावरे यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी राजी करू शकले नाहीत. त्यामुळेच, शरद पवारांनी थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
अजित पवारांना कसली भीती?
बारामतीतील ही लढत केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण तालुक्यातील सहकारी राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांना भीती आहे की, जर त्यांनी ही निवडणूक लढवली नाही, तर शरद पवार व त्यांच्या पॅनलचे मतविभाजन होऊन तावरे यांच्या पॅनलचा विजय होऊ शकतो, ज्यामुळे भाजपला या सहकार क्षेत्रात पाय रोवण्याची संधी मिळून शकते.
आणखी वाचा : ठाकरे गट की भाजपा, मनसेबरोबरची युती कुणासाठी फायदेशीर? आकडेवारी काय सांगते?
पवार कुटुंबियांविरोधात तावरे आक्रमक
मालेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या आणि पवार कुटुंबीय विरुद्ध तावरे कुटुंबीय अशी रंगतदार लढत होत आहे. रंजन तवारे यांचे पुत्र अजिंक्य तवारे म्हणतात, “आमची लढाई ही सहकार चळवळीच्या मूळ तत्वांना वाचवण्यासाठी आहे, ज्याला पवार कुटुंबियांनी आतापर्यंत उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे. “काका असो वा पुतण्या, दोघांमध्ये आम्ही कोणताही भेदभाव करीत नाही. आमचं लक्ष्य फक्त पवार कुटुंबियांच्या वर्चस्वाला थांबवणं आहे.”
अजित पवारांचा आक्रमक प्रचार
संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत तळ ठोकून बसले आहेत. या निवडणुकीत ‘निलकंठेश्वर पॅनेल’च्या विजयासाठी ते आक्रमकपणे प्रचार करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनेलनेही जोरदार प्रचार सुरू केला आहे. बारामतीतील एका स्थानिक रहिवाशाच्या मते, ही लढाई सत्तेइतकीच पैशांसाठीही आहे. ते म्हणतात, “दादा (अजित पवार) यांचे समर्थक अनेक खासगी कारखाने चालवतात. मालेगाव सहकारी साखर कारखान्याने जर शेतकऱ्यांना ऊसाचा दर जास्त दिल्यास इतर कारखान्यांनाही त्यांचे दर वाढवावे लागतील. म्हणूनच अजित पवार हे मालेगाववर नियंत्रण ठेवू इच्छित आहेत.”बारामतीतील ही निवडणूक फक्त स्थानिक नाही, तर राजकीयदृष्ट्या राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वपूर्ण ठरत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.