आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. येत्या ७ सप्टेंबर पासून काँग्रेसतर्फे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी अशा ‘भारत जोडो यात्रेचे’ आयोजन केले जाणार आहे. या यात्रेसाठी लोकांचा पाठिंबा मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत भारत जोडो यात्रेचा उद्देश या सामाजिक कार्यकर्त्यांना सांगून त्यांनीदेखील या यात्रेचा भाग व्हावे असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, राहुल गांधींच्या या आवाहनानंतर योगेंद्र यादव,अरुणा रॉय यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

हेही वाचा >> इतक्या कमी काळात संघ-भाजपने देश ताब्यात कसा घेतला?,राहुल गांधी यांचा नागरी संघटनांच्या बैठकीत सवाल

सोमवारी राहुल गांधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत भारत जोडो यात्रेवर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी अनेकांनी याआधी काँग्रेससोबत वेगवेगळ्या माध्यमातून काम केलेले आहे. या बैठकीत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एकूण ३५०० किमीचा प्रवास करणाऱ्या भारत जोडो यात्रेबद्दल अधिक माहिती दिली. योगेंद्र यादव यांनी २०१९ साली काँग्रेसवर कठोर टीका केली होती. काँग्रेसला आता संपवण्याची गरज आहे. काँग्रेसला संपवून राजकारणाचा नवा मार्ग निर्माण करण्याची गरज आहे, असे योगेंद्र यादव म्हणाले होते. मात्र त्यांनीच आता काँग्रेसच्या या यात्रेला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा >> प्रेम, दया, करुणा आणि धनंजय मुंडे…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा

“भारत जोडो यात्रेला आम्ही पाठिंबा देण्यावर आमचे एकमत झाले आहे. ही काळाजी गरज आहे. आम्ही या यात्रेला वेगवेगळ्या माध्यमातून पाठिंबा देऊ. काही सामाजिक कार्यकर्ते या यात्रेमध्ये सुरुवातीपासूच असतील. काही एका दिवसासाठी आपला सहभाग नोंदवतील. कोणी यात्रेचे स्वागत करेल तर कोणी पाठिंबा देईल,” असे योगेंद्र यादव यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा >> खट्टर सरकारचे कट्टर विरोधक देवेंद्र सिंह बाबली यांची पुन्हा आगपाखड 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आजच्या बैठकीसाठी एकूण १५० सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांना घेऊन या यात्रेचे आयोजन केले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिली. तर मंगळवारी (२३ ऑगस्ट) या यात्रेचा लोगो, टॅगलाईन तसेच एक वेबसाईट सार्वजनिक केली जाईल.