लोकसभेच्या निवडणुकीमधील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी पक्ष भाजपा आणि विरोधी पक्षांच्या प्रचार सभांना वेग आला आहे. भाजपा आणि काँग्रेससहित इतर अनेक राष्ट्रीय पक्षांनी आपला जाहीरनामा घोषित केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूळ मुद्द्यांना बगल देत असून ते ध्रुवीकरणाचे राजकरण करत आहेत”, असा आरोप ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आणि इंडिया आघाडीचे नेते के. सी. वेणूगोपाल यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर केला आहे. के. सी. वेणूगोपाल हे या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमधील आल्लपुळा मतदारसंघातून उभे आहेत. केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले असल्याने त्यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे.

वेणूगोपाल हे आता राजस्थानमधून राज्यसभेचे खासदार आहेत. २००९ ते २०१९ या दरम्यान ते आल्लपुळा या मतदारसंघातून लोकसभेवर होते. आता ते तिथूनच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. संघटनात्मक जबाबदारीचे कारण देत त्यांनी मागील वेळेस या जागेवरून निवडणूक लढवलेली नव्हती. २०१९ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने २० पैकी १९ जागांवर विजय मिळवला होता. फक्त अलप्पुझा या जागेवर त्यांचा पराभव झाला होता. केरळमध्ये या निवडणुकीमध्येही लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या विरोधात उमेदवार दिले आहेत.

मूळ मुद्द्यांना बगल देऊन भाजपाचे ध्रुवीकरणाचे राजकारण

‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये के. सी. वेणूगोपाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वास्तवातल्या मुद्द्यांना बगल देत आहेत आणि ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहेत. केरळमध्ये युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (UDF) सर्वच्या सर्व जागांवर जिंकणार आहे. तिथे भाजपाला आपले खातेही उघडता येणार नाही. काँग्रेसने उपस्थित केलेले मुद्दे लोक स्वीकारत आहेत का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “सध्या देशातील परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. वास्तवातील मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच्या खेळी भाजपा आणि केंद्र सरकार करत असल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे. आम्ही आमचा जाहीरनामा घोषित करण्याआधीपासून ‘पाच गॅरंटी’बाबत बोलतो आहोत. आम्ही लोकांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांबाबत बोलत असल्याचेच यातून दिसून येते. यामुळे लोकांमध्ये आमच्याबाबत सकारात्मक भावना असून लोक त्या या मुद्द्यांचा स्वीकार करत आहेत.”

हेही वाचा : भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?

“‘इंडिया शायनिंग’नंतर जे झाले तेच भाजपासोबत यंदाही होणार!”

पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असल्याचे वातावरण भाजपाने तयार केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, “हे माध्यमांच्या मदतीने तयार करण्यात आलेले वातावरण आहे. मी सगळ्या माध्यमांना दोषी ठरवत नाही. मात्र, माध्यमांमधील एक मोठा वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला मदत करतो आहे. पंतप्रधान मोदींनी काहीही वक्तव्य केले की त्याला लगेच प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे.”
पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘इंडिया शायनिंग’ मोहिमेचा दाखला देत ते म्हणाले की, “२००४ साली अगदी याच प्रकारची मोहीम अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना राबवली गेली होती. ‘इंडिया शायनिंग’ मोहिमेनंतर काय झाले ते आपण पाहिलेच आहे. भाजपाचा पराभव झाला. आता नरेंद्र मोदीही तसेच काहीसे चित्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुर्दैवाने माध्यमेही त्याला हवा देत आहेत. या दाव्यांना मदत करण्यासाठी काही प्रायोजित सर्वेक्षणेही समोर आणली जात आहेत. आम्ही अशा सर्वेक्षणांमध्ये नाही तर लोकांच्या मतांवर विश्वास ठेवतो. देशातील जनतेचे मत काँग्रेस आणि इंडिया आघाडीसोबत आहे. २०२४ च्या निवडणुकीमध्ये आम्हीच सत्तेत येऊ असा विश्वास आम्हाला आहे. पंतप्रधान मोदींनी तयार केलेले हे चित्र आपोआप नेस्तनाबूत होईल.”

“काँग्रेसला गळती असली तरीही…”

राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला. मात्र, राजस्थानसहित या सर्व राज्यांमधून काँग्रेसला अनेक मातब्बर नेत्यांनी सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या मुद्द्यावर ते म्हणाले की, “तेलंगणामध्ये अनेकांनी पक्ष सोडला होता. तिथे आमचे २१ आमदार होते आणि त्यापैकी १६ जणांनी पक्ष सोडला. मात्र, तरीही २०२३ मध्ये आम्ही सत्तेत आलो. अगदी हेच कर्नाटकमध्येही झाले. हिमाचल प्रदेशमध्येही आम्ही सत्तेत आलो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आमचा पराभव झालेला असला तरीही या राज्यांमध्ये काँग्रेसला ४२ ते ४५ टक्के मते मिळाली आहेत. संधीसाधू नेते पक्ष सोडून गेले तरीही कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास असलेले लोक आमच्यासोबतच आहेत.”

हेही वाचा : रायगडमध्ये नामसाधर्म्य उमेदवारांची पंरपरा यंदाही कायम, तीन ‘अनंत गीते’ निवडणुकीच्या रिंगणात

एकमेकांविरोधात लढून विरोधकांचा शक्तीअपव्यय?

विशेषत: केरळसारख्या राज्यामध्ये भाजपाच्या विरोधातील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढून शक्तीअपव्यय करत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “हा प्रश्न भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटच्या नेतृत्वाला विचारायला हवा. टाळी एका हाताने वाजत नाही. शशी थरुर तिरुवनंतपूरममधून खासदार असून तिथूनच लढत आहेत. ते काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. मात्र, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते पन्नियन रवींद्रन यांना उमेदवारी दिली आहे. मी काँग्रेसचा सचिव आहे. माझ्या विरोधातही त्यांनी उमेदवार दिला आहे. इतर सगळे १९ मतदारसंघ सोडा, राहुल गांधी वायनाडमधून उभे आहेत; तर त्यांच्या विरोधातही त्यांनी उमेदवार दिलेला आहे.”

यामुळे या लोकसभा निवडणुकीतील आघाडीची ताकद कमी होईल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “२००४ मध्येही असेच घडले होते. केरळमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची युती होणे अवघड गोष्ट आहे. अगदी तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल पक्षासोबतही युती होणे अवघड आहे. पंजाबमध्येही आम आदमी पक्षासोबत हेच घडते आहे. मात्र, निवडणुकीच्या आधी जशी युती होते तशीच निवडणुकीनंतरही युती होऊ शकते.”