अलिबाग : नावात काय आहे असे म्हणतात. पण निवडणुकीच्या राजकारणात मतपत्रिकेवरील नावेच महत्वपुर्ण ठरतात. कारण चर्चेतल्या नावांचे भांडवल करून निवडणुका लढल्या जातात. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नामसाधर्म्य असेलेले उमेदवार उभे करायचे आणि विरोधकांच्या मतांचे विभाजन करून त्यांची कोंडी करायची अशी खेळी विरोधकांकडून खेळण्यात आली आहे.

माजी केद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ते उमेदवार असून, इंडिया आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी अनंत पद्मा गिते, आणि अनंत बाळोजी गीते नामक दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

आणखी वाचा-भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?

जिल्ह्यात नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये हा नामसाधर्म्याचा वापर करण्यात आला आहे. याची मोठी किंमत प्रस्थापितांना चुकवावी लागली होती. २०१४ निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. सुनिल तटकरे नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला ९ हजार ८४९ मत पडल्याने तटकरे यांचा गीतेंकडून अवघ्या २ हजार मतांनी पराभव झाला होता. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत दोन ए. आर अंतुले नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत बॅरीस्टर ए. आर अंतुले यांचा विजय झाला असला तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डमी अंतुलेंना २३ हजार ७७१ मत पडली होती. १९९६ साली झालेल्या निवडणूकीत दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीतही दत्ता पाटील नावाच्या दोन उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतही २०१९ च्या निवडणूकीत सुनील तटकरे नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तटकरेंच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोन उमेदवांना एकूण पंधरा हजार मतं मिळाली होती.

आणखी वाचा-१७ जागा, एकाच जातीचे उमेदवार विजयी; दशकभराहून अधिक काळ प्रचलित जातीय गणित आहे तरी काय?

नामसाधर्म्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण कारायचा आणि त्यांच्या मतांचे विभाजन करायच हा यामागचा मुळ उद्देश होता. यावर्षी होणाऱ्या लोकसभा ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव, पक्ष, त्याचे निवडणूक चिन्ह आणि फोटो देखील असणार आहे. त्यामुळे समान नावांच्या उमेदवारांचा फंडा कितपत चालेल, हे निवडणूकीनंतरच स्पष्ट होणार आहे. पण मागील निवडणूकांचा अनुभव लक्षात घेऊन, प्रस्तापितांच्या नावांचे भांडवल करून एकमेकवर कुरघोडी करण्याचे राजकारण मात्र तेजीत राहणार आहे हे मात्र निश्चित..