२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. देशात भाजपामय वातावरण आत्ताही आहे असा दावा अनेक भाजपाचे नेते करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच २०२४ च्या जानेवारी महिन्यात राम मंदिर सुरू भाविकांसाठी खुलं होणार अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अशा सगळ्या वातावरणात शशी थरूर यांनी एक भाकित केलं आहे. २०२४ ला भाजपाचा पराभव होऊ शकतो असं थरूर यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे शशी थरूर यांनी?

भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ सारखी कामगिरी करता येणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच २०२४ ला भाजपाचा ५० जागांवर पराभव होईल. भाजपाने याआधीच काही राज्यांमधली सत्ता गमावली आहे. त्यामुळे आता २०२४ ला त्यांना बहुमत मिळणं अवघड झालं आहे. २०२४ मध्ये भाजपाला कदाचित सरकारही स्थापन करता येणार नाही. शुक्रवारी झालेल्या केरळ साहित्य संमेलनात शशी थरूर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

२०१९ सारखा करीश्मा पुन्हा भाजपाला दाखवता येणार नाही

तिरूवनंतपुरमचे खासदार शशी थरूर म्हणाले २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने खूप चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्रातही भाजपाचा करीश्मा दिसला होता. पश्चिम बंगालमध्येही भाजपाने १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र ही परिस्थिती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत असणार नाही. या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुलवामा येथील सैनिकांच्या हत्येचं प्रकरण घडलं होतं. त्यानंतर मोदी सरकारने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला उत्तर दिलं होतं. यामुळे भाजपाला तरूणांचीही मतं मिळाली. या निडवणुकीत ५४३ पैकी ३०३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र असं आता परत घडणार नाही हे शशी थरूर यांनी म्हटलं आहे. तसंच देशाच्या लोकशाहीपुढे घराणेशाही हे सर्वात मोठे आव्हान आहे. जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात त्यांनी आधी स्वतःच्या घरात वाकून बघावं मग दुसऱ्यांना नावं ठेवावी असंही शशी थरूर यांनी खोचकपणे विचारलं आहे. सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही आहे असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे.