जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले; तर एका जागेवर भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाने राज्यसभेची जागा जिंकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगची चर्चा रंगली असून, सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काय घडले?
राज्यसभेसाठीच्या या निवडणुकीत आमदारांच्या संख्याबळाचे समीकरण अत्यंत गुंतागुंतीचे होते. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सकडे मित्रपक्षांसह (काँग्रेस, सीपीआय-एम आणि अपक्ष) अशा एकूण ५३ आमदारांचे संख्याबळ होते. त्या संख्याबळानुसार पहिल्या तीन जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ३० मतांपेक्षा जास्त मते सत्ताधाऱ्यांकडे होती; तर चौथी जागा जिंकण्यासाठी त्यांना भाजपा सोडून इतर विरोधी पक्षांच्या सात मतांची आवश्यकता होती. दुसरीकडे भाजपाकडे २८ आमदारांचे संख्याबळ होते; तर इतर विरोधी पक्षांमध्ये पीडीपीकडे तीन, पीपल्स कॉन्फरन्स पक्षाकडे एक आणि इतर दोन अपक्ष आमदारांचे संख्याबळ होते.
राज्यसभेचा निकाल कसा फिरला?
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी केवळ नॅशनल कॉन्फरन्स पक्ष आणि भाजपानेच उमेदवार उभे केले होते आणि त्यामुळे दोन्ही बाजूंना इतर विरोधी पक्षांच्या समर्थनाची आवश्यकता होती. पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे आमदार सज्जाद लोन यांना वगळता सर्व पक्षांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे चारही उमेदवार सहजपणे निवडून येतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांसह राजकीय पक्षांनी बांधला होता. मात्र, निकालानंतर सर्वांचेच अंदाज फोल ठरल्याचे दिसून आले. शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ९० पैकी एकूण ८६ आमदारांनी मतदान केले. दुपारी ४ वाजता मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली.
आणखी वाचा : Exclusive: प्रशांत किशोर दोन राज्यांचे मतदार! बिहार निवडणुकीपूर्वी मोठी माहिती समोर
पहिल्या तीन जागांवर सत्ताधाऱ्यांची सरशी
पहिल्या तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार निवडून आले. चौथ्या जागेसाठी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि सरतेशेवटी भाजपाने ही जागा आपल्याकडे खेचून आणली. भाजपाचे उमेदवार सत शर्मा यांना ३२ मते; तर सत्ताधारी पक्षाचे उमेदवार इम्रान डार यांना २२ मते मिळाली. विशेष बाब म्हणजे नॅशनल कॉन्फरन्सला जी सात मते मिळण्याची आशा होती; परंतु त्यापैकी चार मते भाजपाच्या बाजूने पडली आणि त्यामुळेच सत शर्मा यांना मिळालेल्या मतांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली. उर्वरित तीन मते अवैध घोषित करण्यात आली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सत शर्मा यांच्यासह भाजपा आमदारांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या निकालानंतर पक्षाच्या चौथ्या उमेदवाराच्या पराभवाचे कारण ‘विश्वासघात’ असल्याचे म्हटले. शेवटच्या क्षणी काही आमदारांनी आम्हाला दगा दिला. भाजपाला ही चार अतिरिक्त मते कुठून मिळाली? कोणत्या आमदारांची मते अवैध ठरवण्यात आली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. नॅशनल काँग्रेस पक्षातील उमेदवारांनी कुठल्याची प्रकारची क्रॉस-व्होटिंग केली नसल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. त्यांच्या प्रतिक्रियेतून बिगर-भाजपा विरोधी पक्षाच्या आमदारांकडून किंवा मित्रपक्षांकडून दगाफटका झाल्याची भावना दिसून येत होती.
भाजपाने घेतला पराभवाचा बदला
राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराचा पराभव हा विश्वासघातामुळे झाल्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले असले तरी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत क्रॉस-व्होटिंग होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एप्रिल २०११ मध्ये काश्मीरमध्ये विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीतही भाजपाच्या ११ पैकी तब्बल सात आमदारांनी पक्षाचा व्हिप झुगारून नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवाराला मतदान केले होते. परिणामी, निवडणुकीत केवळ चारच मते मिळाल्याने भाजपाचे उमेदवार ठाकूर रणजित सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
हेही वाचा : बिहार निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाकडून १६ बड्या नेत्यांची हकालपट्टी; कारण काय?
जम्मू-काश्मीरमधील क्रॉस व्होटिंगचा इतिहास
१९९६ मध्येही जम्मू-काश्मीरमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या दोन आमदारांच्या चुकीमुळे भाजपाचे उमेदवार दया किशन कोतवाल यांचा विजय झाला होता. २००३ मध्ये पीडीपी-काँग्रेस युतीतील आमदारांनी केलेल्या क्रॉस-व्होटिंगमुळे नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्रिलोचन सिंह वझीर विधान परिषदेवर निवडून आले होते. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली. “आम्ही सुरुवातीपासूनच क्रॉस-व्होटिंगबद्दल बोलत होतो. अपक्ष आमदार बरोबर असतानाही नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला संख्याबळ जमवता आले नाही.
चौथ्या जागेसाठी चुरशीची लढत होणार असल्यामुळेच काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता, असे काँग्रेसचे प्रवक्ते रविंदर शर्मा यांनी स्पष्ट केले. इतिहासकार व राजकीय विश्लेषक हरी ओम यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील वाढत्या नाराजीमुळे सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला. भाजपाने या असंतोषाचा फायदा अत्यंत कुशलतेने घेतला आणि इंडिया आघाडीच्या एकजुटीच्या फुग्याला पंक्चर केले, असे हरी ओम यांनी यांनी म्हटले आहे.
