ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे घराणे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात परतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. मोहिते-पाटील कुटुंबीयही सूड उगवायला मैदानावर उतरले असून त्यांचा रोष प्रामुख्याने माढयाचे रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूरचे राम सातपुते या दोन्ही उमेदवारांवर दिसूत येतो. अकलूजमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वक्तव्यातून त्याची प्रचीती आली. राम सातपुते यांना मागील विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून एका रात्रीत आमदार केले होते. परंतु बीड जिल्ह्यातून आलेले हे पार्सल आता सोलापुरातून पुन्हा एका रात्रीत बीडला पाठवू, अशी गर्जना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी त्वेषाने केली. त्याला प्रत्युत्तर देताना इकडे सोलापुरात आमदार राम सातपुते यांनी माझे पार्सल बीडला नव्हे तर दिल्लीला पाठविण्यासाठी सोलापूरकर सज्ज झाले आहेत, असा दावा केला.

अघोषित बहिष्कार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या रत्नागिरीतील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले. भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते पण महायुतीच्या त्रिकोणातील तिसरा कोन, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी खटकणारी होती. या मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. पण येथील राजकीय परंपरा लक्षात घेता  ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, असा शिवसेनेचा आग्रह आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत अजूनही त्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत भाजपाबरोबर कोणत्याही व्यासपीठावर जायचं नाही, असा अलिखित निर्णय सामंत यांच्या शिलेदारांनी केलेला दिसत आहे.  मंत्री चव्हाण यांना याबाबत विचारले असता त्यांनी बाजू सावरून घेत, शिवसेनेचे पदाधिकारी १५ एप्रिलनंतर मेळाव्याला उपस्थित राहतील, असे सांगून टाकले. भाजपच्या वाटयाला हा मतदारसंघ गेला तरी उदय सामंत आणि त्यांचे सहकारी कितपत गांभीर्याने प्रचार करतील याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते.   

कोण दिल्लीत तर कोण गल्लीत ?

रानाकडं आल्यावर घरात जाउन उलिस भाकर-कोरडयास पोटात ढकलत तांब्याभर डेऱ्यातील पाणी पिउन गणुअण्णा चावडीसमोर असलेल्या पारावर उन्हानं होणाऱ्या घालमेल घालवण्यासाठी पिंपळाच्या सावलीत पोहचले. चार गावठी कुत्रीही जीभ आतबाहेर टाकत धपापत हुती. एका कुर्त्यांला हाड म्हून हाकलल, तस, चार कुत्री केकाटत दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. अगोदर सुभ्रावदादा, मास्तर, वरच्या आळीचं चंदू म्हातारं पारावर लवंडली होती. गणुअण्णांनं बंडीतून प्लास्टिक पिशवीत ठेवलेली तंबाखू तळहातावर घेत त्यावर चुना नखानं घालून मळणी करत मास्तरला इचारलं, काय मास्तर औंदा कुणाचा कार्यक्रम ठरला म्हणायचा? मास्तरही नुकताच पंचायतीतलं पेपर वाचून आलवतं. अण्णा, अजून सांगलीच्या आखाडयात कुणा-कुणात कुस्ती लागत्या हे समजल न्हाय, पर दोन पाटलांचा कार्यक्रम ठरलाय हे मात्र खरं, आता कुण्या गावचा पाटील दिल्लीत जातुया आणि कुण्या गावचा पाटील गल्लीत राहुतया याचा इचार करतच गणुअण्णांनं मळलेली तंबाखू चिमटींन व्हटाच्या आता ठेवली.

अफवांची परंपरा अन् सावध भाजप नेते

लोकसभा निवडणुकीच्या काळात अफवा पसरवण्याचे तंत्र चांगलेच विकसित झाले असून समाजमाध्यमाचा यासाठी मोठया प्रमाणावर वापर केला जातो आहे. याचा पहिला फटका भाजपला बसला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हे दोन दिवसांपर्वी लातूरला येऊन गेले. त्यांचा दौरा अचानक ठरला .नांदेड येथे अमित शहा यांची प्रचार सभा होती त्यानंतर महाजन लातूर येथे मुक्कामी थांबले व दुसरे दिवशी महायुतीच्या सर्व प्रमुखांबरोबर त्यांनी बैठक केली. समाजमाध्यमातून आमदार गिरीश महाजन हे लातूरमधील उमेदवार बदलण्याच्या चर्चेसाठी आले होते, असे पसरले, भाजपचा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे अशा अफवा सुरू झाल्या व त्या जिल्हाभर अतिशय वेगाने पसरल्या. शेवटी भाजपला या अफवांचे खंडन करावे लागले. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा दारुण पराभव झाला होता त्यावेळी मोठया प्रमाणावर अफवा तंत्राचा वापर झाला होता. लातूरची ही परंपरा लक्षात घेता भाजप नेते अधिक सावध झाले.

(संकलन : सतीश कामत, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, प्रदीप नणंदकर)