छत्तीसगडची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून पूर्ण प्रयत्न केला जात आहे. तर आपली सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून मतदारांना वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे. आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे बघेल यांनी जाहीर केले आहे.

बघेल यांनी ९२७० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते

काँग्रेसने २०१८ सालच्या निवडणुकीतही असेच आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांनी काँग्रेसला भरभरून मते दिली होती. परिणामी येथे भाजपाला आपली १५ वर्षांपासूनची सत्ता गमवावी लागली होती. सत्तेत आल्यानंतर बघेल यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे ९२७० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. या कर्जमाफीचा १८.८२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला होता. छत्तीसगडच्या राजकारणात शेतकऱ्यांना खूप महत्त्व आहे. याच कारणामुळे बघेल यांनी आता पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्म माफ केले जाईल, अशी घोषणा केली आहे.

१७.५ लाख लोकांना घर देण्याचे आश्वासन

भूपेश बघेल हे सक्ती विधानसभा मतदारसंघात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. काँग्रेसने या निवडणुकीत जातीआधारित जनगणना, १७.५ लाख लोकांना घर, प्रति एकर २० क्विंटर तांदळाची खरेदी अशी आश्वासनं दिली आहेत. यासह येणाऱ्या काही दिवसांतही आम्ही अशाच प्रकारे आणखी आश्वासनं देऊ, असेही बघेल यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर ९० पैकी ७५ जागांवर काँग्रेसचा विजय होईल”

भाजपाने मात्र छत्तीसगडच्या महिला, तरुण, कामगार, शेतकऱ्यांना अद्याप आश्वासनं दिलेली नाहीत. गेल्या आठवड्यात बघेल यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी शेतकरी हा निवडणुकीतील निर्णायक घटक आहे. शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभाल तर ९० पैकी ७५ जागांवर काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास बघेल यांनी व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.