दीपावलीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा संघर्ष पेटू लागला आहे. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक सोहळे अजूनही संपत नसताना शिंदे गटातील जिल्ह्यातील स्थानिक आमदारांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांकडून आपल्याच मंत्र्यांवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. मंत्रीमंडळ विस्तारापूर्वीच जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- उस्मानाबादमध्ये पीकविम्याच्या प्रश्नावरून कैलास पाटील -राणा जगजीत सिंग आमने-सामने; दाेन नेत्यांमधील श्रेयवादाच्या लढाईला हिंसक वळण

राज्यात शिंदे गटाने केलेल्या बंडात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचा पहिल्यापासूनच सहभाग राहिला. त्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील हे शिंदे गटाला जाऊन मिळाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्यातील गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांना स्थान मिळाले. आता दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

शिंदे गटातील पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यातील पूर्वीपासूनचा वाद संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. महाविकास आघाडी सत्तेत असतानाही दोन्ही नेत्यांनी याबाबत जाहीरपणे भाष्यही केले होते. नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावरही दोन्ही नेत्यांमधील वाद कायमच राहिले आहेत. चिमणराव पाटील यांच्या पारोळा-एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कामे देण्यात आली. तसेच कामांच्या भूमिपूजन सोहळ्यास पालकमंत्र्यांचे पुत्र स्वतः उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. चिमणरावांना गुलाबरावांविरुध्द आयताच विषय मिळाला. विरोधी पक्षाच्या कार्यक्रमांना खुद्द मंत्र्यांचे पुत्र उपस्थित राहतात, हा राजकारणातला क्षुद्रपणा आहे, असे करू नये. एका सरकारमध्ये जेव्हा आपण काम करतो, तेव्हा ते सरकार बनविण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. एकेका मतावर सरकार येते. एकेका मतावर सरकार कोसळते. त्यामुळे सरकार हे कोणी मंत्री झाला म्हणून त्यांची खासगी मालमत्ता नसते. सरकार आल्यामुळेच तुम्ही मंत्री आहात, एवढे भान कायम ठेवायला हवे, असे चिमणरावांनी सुनावले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही गार्‍हाणे मांडल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- नगरच्या राजकीय आखाड्यात पाणी योजना मंजुरीच्या श्रेयवादाचे शड्डू

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे मान्य आहे. परंतु, विरोधकांना कामे देऊऩ त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे म्हणजे त्यांना पाठबळ देणे असून, ही बाब अतिशय चुकीची असल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा दावा चिमणरावांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निमंत्रण दिले तरी त्या कार्यक्रमांना आमच्या गटातील लोकांनी जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला. गुलाबरावांनी मात्र विकास कामे होत असतील तर ती कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीमार्फत होत असली तरी आपला पाठिंबा राहील, अशी जाहीर भूमिका घेतली आहे.

हेही वाचा- उद्योगप्रश्नी केंद्राकडे दाद मागण्याचे धाडस शिंदे -फडणवीस सरकार दाखवणार का?; माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सवाल

शिंदे यांच्या बंडात पहिल्यापासूनच सहभागी असलेले आमदार किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिल्याने त्यांना कुटुंबातूनच आव्हान निर्माण झाले आहे. वैशाली सूर्यवंशी या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण ठाकरे गटाकडून सक्रिय झाल्या आहेत. दुसरीकडे किशोर पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची आशा आहे. राज्यात शिंदे-फडणवीस एकत्र नांदत असताना पाचोरा मतदारसंघात मात्र भाजप-शिंदे गट परस्परविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून आमदार किशोर पाटील यांना जोरदार टक्कर देणारे अमोल शिंदे यांच्या खांद्यावर भाजपची तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांनी अलीकडेच किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नगरपलिकेवर २०० कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप करीत युतीधर्माला ‘खो’ दिला, प्रत्युत्तरादाखल किशोर पाटील यांनी भविष्यात ते कधीच अमोल शिंदे यांच्यासोबत कोणतीही युती वा तडजोड करणार नसल्याचे जाहीर करून संघर्षाचा पवित्रा कायम ठेवला आहे. आगामी काळात हे वाद-विवाद कोणत्या थराला जाताता, यावर जिल्ह्यातील शिंदे गटाचे भवितव्य अवलंबून आहे.