नागपूर –‘ भाजपला घाबरू नका, तो शक्तीशाली पक्ष नाही, जर तो तसा असता तर त्यांना काँग्रेस नेत्यांची गरज पडली नसती’ अशा स्पष्ट शब्दात काँग्रेस नेत्यांनी भाजपची भीती दूर सारून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला कामाला लागा असा संदेश जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिला. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेसने आक्रमकपणे पुढे जाण्याचा बेत आखल्याचे यावरून स्पष्ट होते.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काहीशी एक पाऊल मागे गेलेली भाजप विधानसभा निवडणकीनंतर पुन्हा आक्रमकपणे सक्रिय झाली आहे. राज्यातील सत्ता, प्रचंड आर्थिक पाठबळ आणि कार्यकर्त्यांची फळी या जोरावर पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विरोदी पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात प्रवेश देण्याची स्पर्धाच या पक्षात सुरू आहे. जनता दरबार, सिंदूर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र मरगळलेपणा आल्याचे चित्र आहे. विद्यमान सरपंच, माजी जि.प. सदस्य पक्ष सोडून चालले असतानाही त्यांना रोखण्याचे प्रयत्न करताना कोणी दिसत नाही. पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही, नेहमीप्रमाणेच नेत्यांची गटबाजी सुरू आहे. प्रभारी अध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका ज्येष्ठ नेते घेत नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस जिल्हा परिषदेची निवडणूक कशी जिंकणार असा सवाल कार्यकर्ते करीत होते. साम-दाम- दंड भेद वापरून कशाही पद्धतीने निवडणुका जिंकण्याच्या तयारीने भाजपची सुरू असलेली एकीकडे तयारी व दुसरीकडे हिंम्मत हरवून बसलेला विरोधी पक्ष अशी स्थिती सध्या जिल्ह्यात आहे. .त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र नागपूर जिल्ह्यात दिसून येत होते. मानगुटीवर बसलेले भाजपचे भूत उतरवून काँग्रेसही जिंकू शकते अशी उमेद कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण करण्याची गरज होती.
नुकत्याच झालेल्या जिल्हा काँग्रेस समितीच्या बैठकीत पक्षाचे निरीक्षक व माजी मंत्री रणजीत कांबळे यांनी ही बाब ओळखून भाजपची भीती झुगारून देण्याचे आवाहन कार्यकर्ते, पदाधिकऱ्यांना केले. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करते, हे त्यांनी पटवून दिले. गटबाजी विसरून बुथ पातळीपासून संघटना मजबूत करा, भाजप शक्तीशाली पक्ष नाहीच, तो असता तर त्यांनी काँग्रेस नेत्यांना आपल्या पक्षात घेतले नसते.असे सांगून भाजपला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून प्रथमच भाजपला जशास तसे उत्तर देण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे संकेत दिले.
नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची नाळ घट्ट आहे. रामटेक लोकसभेची जागा आणि उमरेडची जागा काँग्रेसने जिंकली. भाजप व एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेने सर्वोतपरी प्रयत्न करूनही त्यांना येथे विजय मिळवता आला नाही. जिल्हा परिषदेवर काँग्रेसचीच सत्ता होती. पक्षाचे नेते सुनील केदार यांचा आजही ग्रामीण भागावर पगडा आहे. तो मोडून काढण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाला सडेतोड भूमिकेची गरज होती. कांबळे यांच्या भूमिकेने ती पूर्ण झाली.