काँग्रेसने शनिवारी (२३ मार्च) लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. पक्षाची अधिकृत यादी जाहीर होण्याआधीच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राजगडमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. ज्या मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले, त्याच मतदारसंघातून ते यंदाची निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवार यादीतही त्यांच्या नावाचा समावेश आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते निवडणुकीतून काढता पाय घेत असल्याचा भाजपाचा आरोप

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पराभवाच्या भीतीने लोकसभा निवडणूक लढवण्यास टाळाटाळ करत असल्याच्या आरोप भाजपाने केला होता. या आरोपांनंतरच त्यांनी ही घोषणा केली. भाजपाच्या आरोपांना आव्हान देत, दिग्विजय सिंह म्हणाले: “मी नरेंद्र मोदी किंवा शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहे) यांच्याविरुद्धही लढण्यास तयार आहे. पण पक्षाने मला येथून (राजगड) लढण्यास सांगितले आहे, त्यामुळे मी याच जागेवरून लढणार आहे.”

nilesh kumbhani
भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
Vishal Patil filed two separate candidatures as Congress and Independent in sangli
सांगलीत विशाल पाटलांचे काँग्रेस व अपक्ष म्हणून दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?

१९९३ ते २००३ या काळात मुख्यमंत्री झाल्यापासून ते राज्यातील निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होते. परंतु, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते भाजपावर वारंवार टीका करताना दिसले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून लोकांसह पक्षातील जुन्या नेत्यांनाही जोडण्याचे काम केले. ज्यानंतर काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते स्वतःची भूमिका मांडताना दिसले आहे. दिग्विजय सिंह यांनी भाजपावर हिंदुत्व आणि इतर वादग्रस्त मुद्द्यांवरून टीका केली आहे.

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना पक्ष कमकुवत असलेल्या ६६ विधानसभा जागांची जबाबदारी सोपवली होती. त्याचा परिणामही दिसला. काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी निवडणुकीच्या शर्यतीत काँग्रेस उमेदवार अखेर पर्यंत होते. दिग्विजय यांच्या समर्थकांनी असा दावा केला की, त्यांना आवश्यक असलेले संसाधन मिळाले नाही.

दिग्विजय सिंह यांचा राजकीय प्रवास

यंदा मध्य प्रदेशमधील राजगडमधून दिग्विजय सिंह स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक रंजक ठरणार आहे. दिग्विजय सिंह १९६९ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी राघोगड नगर पालिका (महापालिका समिती) अध्यक्षपदी निवडून आले. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९७१ पर्यंत ते पालिकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली.

१९७७ मध्ये आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जेव्हा काँग्रेसला प्रत्येक जागेवर पराभव स्वीकारावा लागला, त्याच काळात दिग्विजय सिंह राघोगड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. ही जागा त्यांच्या वडिलांची होती. १९५१-५२ च्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचे वडील राघोगडचे राजा बलभद्र सिंह यांनी ही जागा जिंकली होती. १९९८ आणि २००३च्या निवडणुकीतही दिग्विजय सिंह राघोगड मतदारसंघातून विजयी झाले.

१९८४ मध्ये दिग्विजय सिंह पहिल्यांदा राजगडमधून खासदार झाले. परंतु, १९८९ मध्ये राजगडमधून दिग्विजय यांचा भाजपाच्या प्यारेलाल खंडेलवाल यांच्याकडून ६७,४२४ मतांनी पराभव झाला. या काळात भाजपा आणि व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाची युती होती. या युतीने १९८९ च्या निवडणुकीत केंद्रात काँग्रेसचा पराभव केला होता. जनता दल युतीचे सरकार लवकरच कोसळल्याने, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय यांनी पुन्हा राजगड ही जागा जिंकली. १९९३ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी या जागेची जबाबदारी त्यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांना सोपवली. त्याच्या काही काळानंतरच दिग्विजय सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर लक्ष्मण सिंह यांनी तब्बल पाच वेळा काँग्रेसला ही जागा जिंकून दिली.

२००३ मध्ये दिग्विजय सिंह सरकारची सत्ता गेल्यानंतर त्यांनी पुढील १० वर्षे निवडणूक न लढवण्याची शपथ घेतली. २०१४ पासून ते राज्यसभेचे खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भोपाळमधून निवडणूक लढवली होती. पण, ते भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून ३.६ लाख मतांनी पराभूत झाले होते. दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह भाजपामध्ये सामील झाले. २०१४ आणि २०१९ या दोन निवडणुकांमध्ये ही जागा भाजपाचे खासदार रोडमल नागर यांनी जिंकली.

राजगड मतदारसंघ जिंकण्याची शक्यता किती?

भाजपाचे खासदार रोडमल नागर स्वयंसेवक असून, माजी मुख्यमंत्री चौहान यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे २०१४ साली नागर यांना पहिले लोकसभेचे तिकीट मिळाले होते. २०१९ मध्येही त्यांनी ही जागा जिंकली. मोदी लाट आणि संघाच्या पाठिंब्यामुळे ते विजयी झाले, असे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. २०१९ च्या निवडणुकीत नागर यांनी काँग्रेस उमेदवार मोना सुस्तानी यांचा ४.३१ लाख मतांनी पराभव केला. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस चांगले प्रदर्शन करण्यास असमर्थ ठरली. राजगड लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चाचौरा, राघोगड, नरसिंहगड, बिओरा, राजगड, खिलचीपूर, सारंगपूर आणि सुसनेर या आठ विधानसभा क्षेत्रांपैकी काँग्रेसने फक्त राघोगड ही जागा जिंकली. राघोगड या जागेवरून दिग्विजय यांचा मुलगा जयवर्धन उभे होते.

जानेवारीपासूनच लोकसभेची तयारी

लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्यासाठी दिग्विजय सिंह यांनी जानेवारीपासूनच पूर्व तयारी सुरू केली. त्यांचे विश्वासू सांगतात की, ते मंडल, सेक्टर आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या सभेत सहभागी होत आहेत. तसेच अनुसूचीत जाती/जमातीतील कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेत आहेत. शुक्रवारी (२२ मार्च) ते राजगड जिल्हा काँग्रेस कमिटीने चाचौरा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता परिषदेत उपस्थित होते. या परिषदेत नरसिंहगड, बिओरा, राजगड, खिलचीपूर आणि सारंगपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शनिवारी (२३ मार्च) त्यांनी राजगड जिल्ह्यातील बिओरा येथील हनुमान मंदिराला भेट दिली आणि रामानंदी पंथाचे धर्मगुरू अभिरामदास त्यागी महाराज यांचीही भेट घेतली. त्यांनंतर दिग्विजय सिंह आणि मुलगा जयवर्धन यांनी बिओरा येथे कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केले. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या बैठकांमध्ये दिग्विजय सिंह विधानसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांचे अनुभव ऐकून घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पहिली पत्रकार परिषदही घेतली आहे.

हेही वाचा : गोव्यात पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत पल्लवी डेम्पो?

मोदी सरकारवर हल्ला

या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर हल्ला करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांसारख्या नेत्यांचा मुख्य दोष हा होता की, ते इंडिया आघाडीत होते आणि भाजपाच्या विरोधात लढत होते. “लोक १९७० च्या आणीबाणीची तुलना आता घडत असलेल्या आणीबाणीशी करतात. ती आणीबाणी एका कायद्यान्वये, म्हणजे कायद्यानुसार लागू करण्यात आली होती. पण आताची आणीबाणी असंवैधानिक आहे, जी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या माध्यमातून सुरू आहे,” असे ते म्हणाला. दिग्विजय सिंह यांनी ईव्हीएम विरुद्धचे त्यांचे दावेही कायम ठेवले.