BJP Minister Both Sons Arrested : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) करण्यात आलेल्या कामात घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाजपा मंत्र्याच्या मुलाला गुजरातच्या दाहोद सत्र न्यायालयाने गुरुवारी (तारीख २९ मे) सशर्त जामीन दिला. मात्र, जामीन मिळाल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. मनरेगा योजनेत झालेल्या दुसऱ्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी दाहोद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने (DRDA) पोलिसांत तक्रार दाखल केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन्ही पुत्र अटकेत असल्याने भाजपाचे मंत्री बच्चुभाई खाबड चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील देवगड बारिया तालुक्यातील दोन गावांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अंदाजे ७१ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर गुजरात सरकारमधील भाजपाचे मंत्री बच्चुभाई खाबड यांचे दोन्ही पुत्र बलवंतसिंह आणि किरण खाबड यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. विशेष बाब म्हणजे, मनरेगा योजनेअंतर्गत ज्या गावामध्ये विकासकामे करण्यात आली होती, ते मंत्री खाबड यांचे मूळ गाव असल्याची माहिती आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन्ही मुलांना अटक झाल्यानंतर भाजपाचे मंत्री खाबड यांनी बुधवारी दाहोद जिल्हा सत्र न्यायायलात धाव घेऊन जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, न्यायालायने मंत्री खाबड यांचे धाकटे पुत्र किरण यांना गुरुवारी अंतरिम जामीन दिला. मात्र, जामीनानंतर काही वेळातच दाहोद जिल्हा पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली. ही अटक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MGNREGA) झालेल्या दुसऱ्या कथित घोटाळ्याप्रकरणी करण्यात आली, असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं.
आणखी वाचा : भाजपाच्या मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; सरकार अडचणीत? नेमकं काय आहे प्रकरण?
पोलिसांनी सांगितलं अटकेचं कारण
‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पोलिस अधीक्षक डॉ. राजदीपसिंह झाला म्हणाले, “मनरेगा योजनेत झालेल्या दुसऱ्या घोटाळ्याप्रकरणी दाहोद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक बी.एम. पटेल यांनी भाजपा मंत्र्याच्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून किरण खाबड यांना अटक केली आहे. सध्या या घोटाळ्याची रक्कम निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे. देवगड बारिया तालुक्यातील लावरिया गावात मनरेगा अंतर्गत झालेल्या ७९ कामांपैकी सुमारे २१ कामे अपूर्ण राहिली होती, तरीही या कामांची बिलं काढण्यात आली. पहिल्या एफआयआरप्रमाणेच, किरण यांच्या एजन्सीवर अधिकृत मंजुरी नसतानाही प्रकल्पांसाठी साहित्य पुरवल्याचा आरोप आहे.”
खाबड बंधूंची सशर्त जामीनावर सुटका
मनरेगा योजनेत कथित घोटाळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी खाबड बंधूंना न्यायालयात हजर केले होते. भाजपा मंत्र्याने दोन्ही मुलांच्या जामीनासाठी केलेल्या अर्जावर सरकारी वकिलांनी आक्षेपही घेतला होता. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर बलवंतसिंह आणि किरण खाबड यांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाजपा मंत्र्यांच्या मुलांना दाहोद जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केली. त्याचबरोबर वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहावे लागेल, असे आदेशही न्यायालयाने दोघांना दिले होते.
जामीनावर सुटताच पुन्हा अटक
दरम्यान, गुरुवारी दाहोद तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी काही मिनिटातच किरण खाबड यांना पुन्हा अटक केली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, किरण यांना औपचारिक अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दाहोदच्या क्राईम ब्रँचमध्ये नेण्यात आले, तर बलवंतसिंह यांना ठराविक वेळेत जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले. खाबड बंधूंचे वकील अॅड. ए. आर. चौहान यांनी या अटकेवर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी यापूर्वी सांगितले होते की, दोघांनाही पुढील तपासात पोलिसांना सहकार्य करावे लागेल असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा : माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष भाजपात विलीन होणार?
खाबड बंधूंचे वकील नेमकं काय म्हणाले?
“सत्र न्यायालयाने बुधवारी बलवंतसिंह आणि किरण खाबड यांना सशर्त जामीन देऊन पोलिसांची मागणी फेटाळली आहे. आता दोघेही न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करतील,” असे खाबड बंधूचे वकील चौहान म्हणाले होते. त्यांनी कोर्टात असा युक्तीवाद केला की, बलवंतसिंह आणि किरण खाबड यांच्या कंपनीने मनरेगा योजनेच्या कामात केवळ साहित्य पुरवले होते. प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याचा कोणताही करार त्यांच्यामध्ये नव्हता. त्यामुळे मनरेगा प्रकल्प अपूर्ण राहिल्याची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही.
मुलांना अटक झाल्याने भाजपा मंत्री अडचणीत?
दरम्यान, या कथित घोटाळ्याप्रकरणी भाजपा मंत्र्यांच्या दोन्ही मुलांसह आतापर्यंत एकूण १४ जणांना अटक करण्यात आली आहे. मुलांचे नाव घोटाळ्यात आल्याने भाजपा मंत्री बच्चुभाई खाबड अडचणीत सापडले आहेत. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला होता. त्यांच्या सभेतही मंत्री खाबड हे गैरहजर होते. पंतप्रधानांच्या सभेत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता, असं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं.