पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी वडोदरा आणि दाहोदला भेट दिली, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि सभाही घेतली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुजरात सरकारमधील सर्व नेते उपस्थित होते, मात्र राज्यमंत्री बच्चूभाई खाबड अनुपस्थित असल्याचे स्पष्ट दिसून आले. खाबड यांच्या दोन मुलांना मनरेगा घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे, त्यामुळे भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळातून लवकरच त्यांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चादेखील वाढत आहे. नेमके प्रकरण काय? राज्यमंत्र्यांना मोदी यांच्या सभेपासून दूर का ठेवण्यात आले? त्याविषयी जाणून घेऊयात.
मोदींच्या सभेत मंत्र्याला प्रवेश का नाकारण्यात आला?
सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात देवगड बारियाचे आमदार खाबड यांना सहभागी न करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला. दाहोद जिल्ह्याचे पालकमंत्री कुबेर दिंडोर यांनी घेतलेल्या बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. मुख्य म्हणजे कुबेर दिंडोर खाबड यांचे जवळचे सहकारी मानले जातात. दाहोद कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्याने सांगितले, “खाबड यांच्या मुलांना अटक झाल्याने पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावर त्यांची उपस्थिती स्वीकारली नसती, त्यामुळे त्यांना दूर ठेवणे स्वाभाविक आहे. त्यांनी या निर्णयाला विरोध केला असला तरी हा पक्षाचा आणि सरकारचा निर्णय होता.” पक्षात त्यांच्या हकालपट्टीसाठी दबाव वाढत असल्याने खाबड यांना बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही परवानगी दिली नाही.
घोटाळा प्रकरणात मंत्र्यांच्या मुलांना अटक
राज्यमंत्री बच्चूभाई खाबड यांच्या एका मुलाला म्हणजेच बलवंतसिंह याला १७ मे रोजी आणि दूसरा मुलगा किरण याला १९ मे रोजी मनरेगा घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. योजनेअंतर्गत अपूर्ण प्रकल्पांच्या देयकांमध्ये अनियमितता दिसून आल्याने ही अटक करण्यात आली होती. देवगड बारिया तालुक्यातील दोन आणि धनपूर तालुक्यातील एका गावात, रस्त्याचे अनेक मीटर बांधकाम अपूर्ण ठेवण्यात आले होते, परंतु तरीही एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२४ दरम्यान बनावट पूर्णत्व प्रमाणपत्रे वापरून काही अनधिकृत एजन्सींना पैसे देण्यात आले असल्याचे तपासातून समोर आले होते.
गेल्या आठवड्यात खाबड यांनी त्यांच्या मुलांचा बचाव करणारे दोन व्हिडीओ पोस्ट केले आणि आपल्या मुलांनी काहीही चुकीचे केले नाही असा दावा केला. त्यांनी आपले पद सोडणार असल्याचे दावेदेखील नाकारले आणि त्यांनी ज्या विभागांचे नेतृत्व केले, त्या विभागात केलेल्या कामांचा ‘पारदर्शक’ असा उल्लेख केला. भाजपा मंत्र्यांनी म्हटले की, खाबड यांनी पक्षाची प्रतिक्रिया येईपर्यंत वाट पाहायला हवी होती. “मोदींच्या भेटीची तयारी आणि स्थळांची पाहणी करण्याबद्दल सोशल मीडियावरील पोस्ट अयोग्य होत्या,” असे एका नेत्याने म्हटले.
गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर खाबड म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्री पटेल यांना ‘अनुपस्थितीचा अहवाल’ पाठवला होता. “आता मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे, जिथे खाबड आणि पक्षासाठी घातक ठरणाऱ्या काही मंत्र्यांना बाहेर काढले जाईल. खाबड यांना महिसागरचे जिल्हा प्रभारी म्हणूनही राजीनामा देण्यास सांगितले जाईल,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की, खाबड यांच्या हट्टीपणामुळे दिंडोर आणि भाभोरमधील लोकसभा खासदार जसवंतसिंह भाभोर आणि लिमखेडाचे आमदार शैलेश भाभोर यांच्यातही भांडण झाले आहे. या घोटाळ्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आणि काँग्रेसने हा मुद्दा विधानसभेतदेखील उपस्थित केला होता, त्यानंतर भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, पक्षाला खरा धक्का खाबड यांच्या मुलांना अटक झाल्याने बसला.
एका भाजपा नेत्याने सांगितले, “एफआयआरमध्ये थेट नाव नसतानाही बलवंतसिंह आणि किरण यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याने सरकारचा संताप वाढला. मनरेगा प्रकल्पांच्या ग्रामीण विकास प्राधिकरणाच्या केंद्रीय तपासणीदरम्यान कथित योजनेतील कथित अनियमितता उघडकीस आल्या. या प्रकरणानंतर या भागातील आणखी गावांनी असेच दावे केले. जर या दोघांनी आवेगपूर्ण पावले उचलली नसती तर इतकं नुकसान झाले नसते, ” असेही त्यांनी सांगितले.
खाबड यांचा धाकटा मुलगा किरण याला अटक करण्यात आली, तो बच्चूभाई खाबड यांचा राजकीय वारसदार असल्याचे म्हटले जाते. “किरण वडिलांच्या मतदारसंघात व्यवहार सांभाळत असल्याने त्यांना वारसदार मानले जात होते. जर चौकशीत मुलांना निर्दोष ठरवण्यात आले तरच खाबड यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी ठोस आधार मिळेल,” असे एका स्थानिक भाजपा नेत्याने म्हटले आहे.
गुजरात काँग्रेसने खाबड यांना सध्या पक्ष कार्यक्रम आणि इतर गोष्टींपासून लांब ठेवले आहे. मात्र, यावर गुजरात काँग्रेसने आरोप केले आहेत. गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. मनीष दोशी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “दोन घटनांमुळे खाबड यांना बाजूला करणे हा भाजपाचा चेहरा वाचवण्याचा एक प्रयत्न आहे. जेव्हा जेव्हा कोणी पक्षसमर्थित भ्रष्टाचारात अडकतो, तेव्हा भाजपा संबंधित व्यक्तीला थोड्या काळासाठी बाजूला ठेवते आणि लोकांची फसवणूक करते. भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे. खाबड यांचा राजीनामा मागण्यापासून किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यापासून त्यांना कोण रोखत आहे? जर त्यांना खरोखरच लाज वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” असे ते म्हणाले.