चंद्रपूर : काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात लोकसभा उमेदवारीवरून वाद सुरू झाला असून यामुळे पक्षात स्थानिक पातळीवर उभी फूट पडली आहे. ओबीसीबहुल चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक दावेदार असले तरी प्रामुख्याने आमदार प्रतिभा धानोरकर व प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यात स्पर्धा सुरू आहे. पती बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर नैसर्गिक न्यायाप्रमाणे आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा दावा प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे.

शिवानी वडेट्टीवार हिने दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते जयराम रमेश, खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेकांच्या भेटी घेतल्या. सध्या जिल्ह्यात धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असे दोन गट पक्षात पडले आहेत. धानोरकर समर्थकांनी महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावून स्थानिक उमेदवार हवा, असा ठराव काँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठवला. विशेष म्हणजे, सध्या धानोरकर यांच्यासोबत असलेले काही प्रदेश पदाधिकारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नागपूरचे आशीष देशमुख यांना चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीवाऱ्या करीत होते. तर काही भाजपात सक्रिय होते.

Sangli, Congress palm symbol, Congress,
सांगलीत सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह गायब
Pankaja Munde, Pankaja Munde campaign rally,
पंकजा मुंडेंच्या प्रचार मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन, आमदार मुंदडा अनुपस्थित
Rahul Gandhi do a miracle
काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !

हेही वाचा : काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! पहिल्या समन्वय बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

वडेट्टीवार यांची मुलीसाठी मोर्चेबांधणी

वडेट्टीवार यांनीही २०१९ मध्ये विनायक बांगडे यांना जाहीर झालेली उमेदवारी बाळू धानोरकर यांना मिळावी यासाठी दिल्लीत प्रयत्न केले होते. मात्र आता २०२४ मध्ये बांगडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करून २०१९ चे ऋण फेडण्याऐवजी वडेट्टीवार यांनी स्वत:च्या मुलीचे नाव समोर केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात तीव्र नाराजी आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर वडेट्टीवार यांच्या सोबतीला जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस यापैकी कुणीच नाही. काँग्रेस संघटनेसोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचा एकही जिल्हाध्यक्ष सोबत नसल्याने वडेट्टीवार यांची चांगलीच अडचण झाली आहे.

हेही वाचा : बंगालमध्येही ‘ताई-दादा’ आमनेसामने; कोण आहेत बाबून बॅनर्जी?

निवडणुकीच्या तोंडावर मतभेद चव्हाट्यावर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. ही जागा कायम ठेवण्यासाठी पक्ष एकसंघ असणे आवश्यक आहे. काँग्रेस एकसंघ होती तेव्हा तेव्हा लोकसभा निवडणुकीत पक्षाने विजय मिळवला असा आजवरचा इतिहास आहे. २०१९ च्या निवडणुकीत वडेट्टीवार व धानोरकर एकत्र होते. त्यांच्या सोबतीला जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे व अन्य सहकारी होते. मात्र आज जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार असून देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष दुभंगला गेला आहे.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

आमदार धानोरकर यांनी पक्षांतर्गत विरोधामुळेच नवऱ्याचा जीव गेला, दुसरा बळी मी जाऊ देणार नाही अशी टीका वडेट्टीवार यांचे नाव न घेता केली आहे. तर वडेट्टीवार यांनी दिवंगत खासदार यांचा मृत्यू कशामुळे झाला याची पूर्ण कल्पना आमदार प्रतीभा धानोरकर यांना असल्याचे म्हटले आहे. तसेच शिवानी वडेट्टीवार यांनी सावध प्रतिक्रिया देताना धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यात वडील वडेट्टीवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोप-प्रत्यारोपांमुळे या दोन गटातील संघर्ष कोणत्या स्तरावर कोणत्या स्तराला गेला याचा प्रत्यय येतो.

हेही वाचा : CAAच्या माध्यमातून मतुआ समाजाची मतं वळवण्याचे भाजपाचे डावपेच

काँग्रेसपुढे अडचणी

धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तरी वडेट्टीवार प्रचारात सक्रिय होणार नाहीत. वडेट्टीवार यांची शक्ती या लोकसभा क्षेत्रात आहे. त्यांच्या पाठीशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा फौजफाटा आहे. अशा आरोपांमुळे वडेट्टीवारच दूर राहिले तर त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भोगावा लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वडेट्टीवार-धानोरकर या दोन गटात वाद शिगेला पोहचल्याने काँग्रेसपुढे अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते वडेट्टीवार-धानोरकर असे विभागले गेले आहेत. त्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.