सांगली : विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देउन आगामी काळात शत प्रतिशत भाजपा अशीच वाटचाल निश्‍चित केली असल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांना शह देत भाजपसाठी स्वतंत्र अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न या मतदार संघात भाजपचा दिसून येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचा हा घरचा मतदार संघ असल्याने त्यांनाही बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यासाठी मतदार संघाची बांधणी करायची आहे. मात्र, भविष्यात काय असेल हे ठामपणे सांगता येत नसले तरी आगामी विटा नगरपालिका व पंचायत समितीसाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा रणसंग्राम चांगलाच रंगण्याची चिन्हे मात्र नाकारता येत नाहीत.

खानापूर व आटपाडी या दोन तालुक्याचा हा विधानसभा मतदार संघ. भिवघाट उतरले की आटपाडी तालुक्यातील माणदेशाचा प्रदेश, तर घाटावर आले की खानापूर-विट्याची सुवर्णकारागिरी टुमदार बंगल्यांनी नजरेत भरते. विटा हे तालुक्याचे प्रशासकीय शहर असले तरी तालुक्याचे नाव मात्र खानापूर आहे. खानापूरात आजही शिवकालीन बुरूज दिसून येतात. ऐतिहासिक संदर्भ असलेला हा तालुका आणि स्वराज्याचे पहिले गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधी असलेला भूपाळगड तथा बाणूरगड याच परिसरात आहे. यामुळे या भागाला ऐतिहासिक संदर्भ आहेत. या भागाचे नेतृत्व बहुतांशी वेळा खानापूर तालुक्यानेच केले आहे. अपवादात्मक स्थितीत राजेंद्रअण्णा देशमुख यांना १९९५ मध्ये संधी मिळाली होती. संपतराव माने, हणमंतराव पाटील, सदाशिवराव पाटील आणि अनिल बाबर यांनाच या मतदार संघाने नेतृत्वाची संधी दिली. आता दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते राजकीय पटलावर आले आहेत. स्व. अनिल बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांच्याकडे या गटाचे नेतृत्व आले आहे तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाचा वारसा वैभव पाटील यांच्याकडे आहे.

विटा नगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्याचा दरवेळी बाबर गटाकडून प्रयत्न झाले, मात्र यात त्यांना यश मिळालेले नाही. पाटील गटांने विटा शहरावर आपले वर्चस्व आतापर्यंत तरी कायम राखले आहे. मात्र, घाटावरचेच नेतृत्व कशासाठी असे म्हणत आटपाडीने सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला. यातून आमदार पडळकर यांनीही या मतदार संघातून नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जनतेने त्यांना स्वीकारले नाही, यामुळे त्यांनी सुरक्षित मतदार संघ म्हणून जतमध्ये बस्तान बसविले. आणि आमदारकीची वस्त्रेही पटकावली. आता त्यांच्या बंधूना ब्रम्हानंद पडळकर यांना आमदारकीची स्वप्ने पडत असून त्यासाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आटपाडीच्या राजकारणातील माणगंगा साखर कारखान्याचे दुखणे देशमुख कुटुंबाच्या मागे आहे. परंतु आता देशमुख वाड्यावरही फूट पडली असून जेष्ठत्व असलेले माजी आमदार राजेंद्र देशमुख राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात डेरेदाखल झाले आहेत, तर बंधू अमरसिंह उर्फ बापूसाहेब देशमुख हे भाजपमध्येच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा मतदार संघातील राजकीय स्थिती संमिश्र असताना वैभव पाटलांचा भाजप प्रवेश मात्र येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती अंतर्गत संघर्षाचा पट मांडणारा ठरणार आहे. पाटील गटाला विटा नगरपालिकेच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी बाबर गटाचे प्रयत्न सुरू राहतील तर पंचायत समितीमध्ये पर्यायाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाटील गटाला ग्रामीण भागात बस्तान बसवायचे आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून गेली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा गट कधी अपक्ष, कधी, काँग्रेस, कधी राष्ट्रवादी (अजित पवार) असे करत आता भाजपच्या गोटात सामील झाला आहे. बाबर गट तर शिवसेनेेत फूट पडल्यापासून शिंदे शिवसेनेतच आहे. मुळचा हा गट राष्ट्रवादीचा. मात्र, बदलत्या राजकीय स्थितीत हा गट कायम सत्तेच्या वर्तुळातच राहिला आहे. आता भाजपचे पाटील विरूध्द शिवसेनेचे बाबर असा सामना रंगणार आहे. राज्य पातळीवर महायुतीने एकत्रित निवडणुका लढविण्याचा निर्णय जरी घेतला तर स्थानिक पातळीवर तो मान्य होईलच असे नाही. यामुळे महायुतीतील हा संघर्ष जिल्ह्याबरोबरच राज्यालाही पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.