आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घडामोडी वाढल्या आहेत. लवकरच या आघाडीत जागावाटप होऊ शकते. त्यासाठी आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्य काँग्रेसने आपल्या पक्षाच्या वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, याच जागावाटपाच्या चर्चेदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री तथा संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार आघाडीच्या निमंत्रकपदी?

नितीश कुमार यांची इंडिया आघाडीच्या निमंत्रकपदी तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दल, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच काही डाव्या पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांना निमंत्रकपद देण्याची काँग्रेसची तयारी आहे. नितीश कुमार यांना खूश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. “काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारत न्याय यात्रेवर असणार आहेत. अशा काळात नितीश कुमार हे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत गेल्यास इंडिया आघाडीतील सर्व पक्ष एकत्र राहणार नाहीत. इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी हीच चिंता व्यक्त केलेली आहे. नितीश कुमार यांना निमंत्रकपद देण्याची तयारी झालेली असली तरी या आघाडीत काँग्रेस हाच प्रमुख पक्ष राहणार आहे. कारण या आघाडीच्या अध्यक्षपदी खरगे यांची नियुक्ती केली जाऊ शकते,” असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

“विरोधकांना एकत्र आणण्यात नितीश कुमार यांचे योगदान”

नितीश कुमार यांना निमंत्रकपद देण्यास सुरुवातीला राजद पक्ष तयार नव्हता. मात्र नंतर या पक्षाने तशी तयारी दर्शवली. “विरोधकांना एकत्र आणण्यात नितीश कुमार यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना योग्य स्थान देणे गरजेचे आहे. नितीश कुमार यांना निमंत्रकपद दिले म्हणजे ते पंतप्रधापदाचे उमेदवार असतील, असे नाही. विरोधकांना एकत्र आणण्यात त्यांचे योगदान आहे,” असे इंडिया आघाडीतील सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र्र, बिहार, कर्नाटकवर लक्ष देणे गरजेचे

दरम्यान, बिहारमधील काँग्रेसच्या नेत्याने नितीश कुमार यांची संभाव्य नियुक्ती आणि इंडिया आघाडीची पुढील वाटचाल यावर भाष्य केले आहे. “विरोधकांच्या आघाडीने कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या महत्त्वाच्या राज्यांवर लक्ष दिले पाहिजे. कारण या राज्यांत लोकसभेच्या एकूण १७९ जागा आहेत. या राज्यात इंडिया आघाडी बहुतांश जागा जिंकण्याची शक्यता आहे. ओडिसा राज्यातील बिजू जनता दल भाजपासोबत जाण्याची शक्यता आहे,” असे मत या नेत्याने व्यक्त केले.