संतोष प्रधान

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड सर करण्यासाठी भाजपने आतापासूनच प्रयत्न सुरू केले असले तरी १९५७ मध्ये हा बारामती मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून काँग्रेस किंवा शरद पवार यांचाच पगडा या मतदारसंघावर राहिला आहे. दोनदा जनता पक्षाचे संभाजीराव काकडे निवडून आले असले तरी त्यांना पवारांची मदत झाली होती.

बारामती जिंकणे सोपे नाही याची भाजप नेत्यांनाही चांगली जाणिव आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चांगली लढत दिली होती. यामुळे २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पुण्यात झालेल्या मेळाव्यात अमित शहा यांनी बारामती जिंकायची आहे, असा संदेश दिला होता. पण तेव्हा सुप्रिया सुळे यांनी चांगला विजय प्राप्त केला होता. यंदा भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live Update : दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं; ठाकरे गटाची सुधारित याचिका, तर शिंदेंकडूनही विरोधात अर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर हा मतदारसंघ १९५७ मध्ये अस्तित्वात आल्यापासून कायमच काँग्रेस किंवा पुढे पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. १९५७ मध्ये काँग्रेसचे केशवराव जेधे हे निवडून आले होते. १९६२ मध्ये गुलाबराव जेधे, १९६७ मध्ये तुळशीदास जाधव, १९७१ मध्ये आर. के. खाडीलकर विजयी झाले होते.

१९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव

१९७७ मध्ये देशात जनता लाटेत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला होता. परंतु राज्यातील काही प्रभाव क्षेत्रे काँग्रेसने कायम राखली होती. बारामतीमध्ये मात्र पक्षांतर्गत लाथाळ्यांमधून काँग्रेसचा पराभव झाल्याचे बोलले जाते. तेव्हा बॅ.विठ्ठलराव गाडगीळ यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी सूचना इंदिरा गांधी यांनी केली होती. शरद पवार आणि गाडगीळ यांचे पक्षांतर्गत संबंध तेवढे काही सलोख्याचे नव्हते. परिणामी गाडगीळ बारामतीमधून लढण्यास इच्छूक नव्हते. पण इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे गाडगीळ यांचा नाईलाज झाला. बारामतीमध्ये तेव्हा भारतीय लोकदल – जनता पक्षाचे संभाजीराव काकडे आणि गाडगीळ अशी लढत झाली होती. शरद पवारांच्या मदतीबाबत गाडगीळ सुरुवातीपासूनच साशंक होते. बारामतीमधील प्रमुख कार्यकर्ते सक्रिय प्रचारापासून दूर होते तेव्हाच काँग्रेसच्या गोटात शंकेची पाल चुकचुकली होती, असे तेव्हा प्रचारात सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येते. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची काकडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या निवडणुकीत काँग्रेसचे गाडगीळ यांचा ३० हजार मतांनी पराभव झाला होता.

हेही वाचा… भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उधळले करोडो रुपये; काँग्रेसने किती केला खर्च?

१९८० मध्ये काँग्रेसचे शंकरराव बाजीराव पाटील निवडून आले. १९८४ मध्ये देशभर इंदिरा गांधी यांच्या सहानुभूतीची लाट असताना समाजवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार निवडून आले होते. पण त्यांनी विधानसभेतच काम करणे पसंत केले. १९८५ मध्ये पोटनिवडणूक झाली तेव्हा पवारांनी जनता पक्षाचे संभाजीराव काकडे यांना पाठिंबा दिला व काकडे विजयी झाले. १९९६ ते २००९ या काळात शरद पवार यांनीच बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. २००९ पासून सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत.

पवारांचा प्रभाव

१९७७ मध्ये जनता लाटेत काँग्रेसचा बारामतीमध्ये पराभव झाला. तेव्हाही पवारांच्या पसंतीचा उमेदवार रिंगणात असता तर निवडून आला असता, अशी आठवण जुने काँग्रेसजन सांगतात. १९८५ मध्ये पवारांच्या मदतीनेच जनता पक्षाचे संभाजीराव काकडे निवडून आले होते. तेव्हा पवार काँग्रेसच्या विरोधात होते. एकूणच या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास बारामतीवर काँग्रेस किंवा पवारांचाच पगडा राहिला आहे.

हेही वाचा… मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ,सरसंघचालकांची मशिदीला भेट

बारामतीच्या राजकारणात पवार आणि काकडे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत होते. पण तेव्हा काँग्रेसला धडा शिकविण्याकरिता पवारांनी काकडे यांना मदत केली होती.