राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी भाजपाबरोबर युती करण्याचं कार्यकर्त्यांना कारण सांगितले आहे. राष्ट्रीय लोक दला (RLD)चे प्रमुख जयंत सिंह चौधरी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान आणि त्यांचे आजोबा चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयाचे श्रेय दिले. मुझफ्फरनगरमधील एका मेळाव्याला जयंत चौधरींनी संबोधित केलंय, त्यावेळी ते बोलत होते. तसेच जयंत चौधरी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय. भारतरत्न हा काही छोटा पुरस्कार नाही आणि लोक मानसन्माना(स्वाभिमान)साठी सर्व काही त्याग करतात, असंही ते म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये छोटी छोटी नाराजी असणे स्वाभाविक आहे. खरं तर आमची भाजपाबरोबर युती आहे. भाजपा कार्यकर्ते आणि राष्ट्रीय लोकदलाच्या कार्यकर्त्यांनाही मतदारांनी अधिक सन्मान दिला पाहिजे. भारतरत्न हा सन्मान काही छोटा पुरस्कार नाही. चौधरी चरणसिंग हे भारतरत्न मिळालेल्या पात्र लोकांपैकीच एक आहेत. खरं तर लोक आदरासाठी सर्वस्वाचा त्याग करतात. ही आमच्यासाठी छोटी गोष्ट नाही,” असंही जयंत चौधरी म्हणाले. विद्यमान भाजपा खासदार संजीव बल्यान तिसऱ्यांदा पुन्हा निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघातून जात ६० किमीच्या रोड शोचा समारोप केला. बिजनौरमध्ये आरएलडीने आमदार चंदन चौहान यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचाः रायगडमध्ये तटकरे – गोगावले यांच्यात दिलजमाई

राज्याच्या हिताचा विचार करून आम्ही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असंही जयंत चौधरी म्हणालेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका समाजवादी पक्षाबरोबर युती करून लढवणाऱ्या आरएलडीने मार्चच्या सुरुवातीला सपाला धक्का देत एनडीएमध्ये प्रवेश केला होता. त्या काळात लखनौमध्ये चौधरी अजित सिंगजी (माजी केंद्रीय मंत्री आणि जयंत यांचे वडील) यांचे पुतळे बसवले होते. जनतेच्या नजरेत एखादी व्यक्ती कायम राहावी म्हणून मूर्ती तयार केली जाते. भारतरत्न पुरस्कारदेखील तेच आहे,” असेही ते म्हणाले. त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारला तरुणांसाठी अधिक प्रभावी योजना तयार करण्यास सांगितले आहे, आरएलडी प्रमुख म्हणालेत.

हेही वाचाः हातकणंगलेत पुन्हा एकदा साखर कारखानदार – शेतकरी नेत्यात लढत

देशात अनेक पक्ष आहेत, पण काही पक्षांचे पदाधिकारी पाहिल्यावर फक्त वरिष्ठांनाच पदे मिळतात हे दिसून आलेय. आमचा पक्ष शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना जात, धर्म नसते. जे शेतकरी शेती करतात, पण त्यांच्या मालकीची जमीन नाही त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा ही सरकारची प्राथमिकता असायला हवी,” असेही जयंत चौधरी म्हणाले. खरं तर हे माझे विचार नाहीत तर चौधरी चरणसिंग यांचे आहेत, असंही त्यांनी अधोरेखित केलं. माझ्या निर्णयाला कार्यकर्ते साथ देतील, अशी मला आशा आहे. खरं तर पक्ष आपले मुद्दे पुढे नेण्यासाठीच युती करतात. त्यामुळे निवडणूक ही एखाद्या समाजिक चळवळीपेक्षा कमी नसते. सामाजिक क्रांती घडवून आणण्याबरोबरच देशाला पुढे नेण्यासाठी लोकशाही टिकवून ठेवली पाहिजे, असंही जयंत चौधरी म्हणालेत. हिंदू-मुस्लिम यांनी एकत्र आलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला. खरं तर आठवडाभरापूर्वी मुझफ्फरनगरच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर व्यासपीठ शेअर करताना जयंत यांनी सपापासून फारकत घेण्याच्या त्यांच्या निर्णयाला राजकीय भूमिका म्हटले होते. तसेच सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा खरपूस समाचार घेतला होता. यावेळी त्यांनी कुस्तीचा संदर्भ देत अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट मतदारांमध्ये आपला पाठिंबा असलेला आरएलडी भाजपाबरोबर युती करून लोकसभेच्या दोन जागा म्हणजेच बागपत आणि बिजनौर लढवत आहे.