दिल्लीमध्ये अबकारी कर अंमलबजावणी धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी तथा तेलंगाणा विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपामुळे दिल्लीपासून ते तेलंगाणापर्यंत के. कविता हे नाव चर्चेत आले आहे. तेलंगाणा भाजपाने हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून येथे अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आहेत. दरम्यान, के. कविता यांच्यावर झालेले आरोप म्हणजे तेलंगाणामध्ये विस्तारण्याची संधी असल्याचे भाजपाला वाटत आहे. त्या दृष्टीने भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगाणामधील राजकारण तसेच के. कविता यांच्याबद्दल जाऊन घेऊया.
हेही वाचा >> दुरदर्शन अँकर, टिकटॉक स्टार ते राजकीय नेत्या; कोण होत्या सोनाली फोगट ज्यांच्यावर भाजपाने दिली होती मोठी जबाबदारी
के. कविता या तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी असून त्या माजी खासदार तसेच विधान परिषदेच्या आमदार आहेत. दिल्लीमधील मद्य विक्री परवाना धोरणातील कथित भ्रष्टाचारात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. हा मुद्दा घेऊन भाजपा तेलंगाणामध्ये आपला विस्तार करू इच्छित आहे. याच कारणामुळे भाजपा आणि तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. तेलंगाणा भाजपा प्रदेशाध्यक्ष संजय कुमार यांच्या नेतृत्वात तेलंगाणामध्ये निदर्शन करण्यात आले. त्यानंतर त्यांना तेलंगाणा पोलिसांनी अटक केली होती. के. कविता यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
के. कविता या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आपले पदव्यूत्तर शिक्षण अमेरिकेत पूर्ण केले. तेलंगाणा राज्य निर्मितीच्या चळवळीला बळ मिळालेले असताना त्या भारतात परतल्या होत्या. या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. अनेकदा त्यांनी महिलांच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यादरम्यानच त्यांचा तेलंगाणा राज्याची संस्कृती आणि परंपरा यांच्याशी जवळचा संबंध आला. २००६ साली तेलंगाणा राष्ट्र समितीची स्थापना झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी के. कविता यांनी तेलंगाणा जागृती संघटनेची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून त्यांनी पुढे परंपरांचा प्रचार प्रसार करण्याचे काम केले.
हेही वाचा >> तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे दिल्लीतील अबकारी कर धोरण गैरव्यवहारात नाव, भाजपाने केला गंभीर आरोप
याच कामचा भाग म्हणून त्यांनी तेलंगाणामधील बथुकम्मा फ्लॉवर फेस्टिव्हलला पुनरुज्जीवित केले. बथुकम्मा फ्लॉवर फेस्टिव्हल महत्त्वाचा असूनही त्याला तेवढे महत्त्व दिले जात नाही, असे वक्तव्य के. कविता यांनी एकदा केले होते. २०१४ साली जेव्हा तेलंगाणा राज्याची निर्मिती झाली तेव्हा या फेस्टिव्हलला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी या फेस्टिव्हलला ओळख मिळवून देण्याऱ्या चळवळीचेही नेतृत्व केले. पुढे या फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये अनेक राजकारणी, अभिनेता-अभिनेत्र्या आणि इतर सेलिब्रिटींनी सहभाग घेतला.
हेही वाचा >> आणि गोगावले म्हणाले..”वो क्या धक्काबुक्की करेंगे हमने उनको धक्काबुक्की किया”
राजकीय प्रवास
के. कविता यांनी २०१४ साली निझामाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे दोन वेळा खासदार असलेले मधू गौड यास्की यांचा १.६७ लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यांनी आपली खासदारकी चांगलीच गाजवली. मात्र शेकऱ्यांच्या मनात त्या स्थान निर्माण करू शकल्या नाहीत. हळदीच्या भावाचे नियमन करण्यासाठी वेगळ्या बोर्डाची स्थापना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली होती. मात्र ही मागणी पूर्ण करू न शकल्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नराज होते. याच गोष्टीचा फायदा भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत घेतला आणि धर्मपुरी अरविंद यांनी कविता यांना पराभूत केले.
हेही वाचा >> “मनीष सिसोदियांना ‘भारतरत्न’ द्यायला हवा, पण..,” सीबीआयच्या छापेमारीनंतर अरविंद केजरीवाल यांचे मोठे विधान
या पराभवानंतर ऑक्टोबर २०२० साली त्यांना निझामाबादहून विधान परिषदेवर पाठवण्यात आले. त्या भाजपावर सातत्याने टीका करत आल्या आहेत. सध्या त्या विधान परिषदेवर आमदार असल्या तरी निझामाबाद मतदारसंघातून लोकसभेत जाण्यासाठी त्या उत्सूक आहेत. त्यासाठीची तयारी त्यांनी सुरू केली आहे. भाजपाने त्यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल हे येणारा काळच ठरवेल.