कर्नाटकमध्ये वाढत्या जातीय हिंसाचारामुळे गुरुवारी काँग्रेसमधील मुस्लीम समुदायातील अनेक नेत्यांनी राजीनामा दिला, ज्यात केपीसीसीचे सरचिटणीस एम. एस .मोहम्मद आणि दक्षिण कन्नड जिल्हा अल्पसंख्याक शाखेचे अध्यक्ष के. के. शाहुल हमीद यांचादेखील समावेश आहे. कर्नाटकमध्ये अलीकडेच घडलेल्या एका हत्या प्रकरणामुळे नेत्यांकडून राजीनामा देण्यात आला आहे. हे हत्या प्रकरण नक्की काय आहे? मोठ्या संख्येने मुस्लीम नेत्यांनी राजीनामा देण्याचे कारण काय? जाणून घेऊयात.
हत्या प्रकरण काय?
मंगळवारी मंगळुरूजवळील बंटवाल येथे अब्दुल रहीम नावाच्या व्यक्तीची भरदिवसा वार करून हत्या करण्यात आली, तर या हल्ल्यात त्याचा एक मित्र आणि सहकारी गंभीर जखमी झाले. राजीनामा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जी. परमेश्वर यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयावर या प्रदेशातील जातीय घटना रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कर्नाटकच्या दक्षिण कन्नड येथील काँग्रेसचे आमदार बी. के. हरिप्रसाद यांची भेट घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने किनारी जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांची बदली केली.
अनेक मुस्लीम समुदायातील काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी राजीनामा देणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. त्यानंतर मंत्री जमीर अहमद यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पुनर्विचार करण्याचे आवाहनदेखील केले. मात्र, मुस्लीम नेत्यांनी बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. त्यांनी दिलेल्या शब्दापासून मागे हटल्यामुळे त्यांच्यावर टीका केली आणि अब्दुल रहीमला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. अखेर नेत्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अनेक जिल्हा आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनीही राजीनामा दिला आहे.
राजीनाम्याचे कारण काय?
राजीनामा देण्यापूर्वी बैठकीत उपस्थित नेत्यांशी बोलताना दक्षिण कन्नड जिल्हा अल्पसंख्याक शाखेचे अध्यक्ष के. के. शाहुल हमीद म्हणाले की, संकटाच्या काळात अल्पसंख्याक समुदाय काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र, कर्नाटकातील सरकार भाजपा आणि संघ परिवाराकडून मुस्लीम समुदायाचा होणारा छळ रोखण्यात अपयशी ठरले आहेत. ते म्हणाले, “आमचे माता, पत्नी आणि मुलेदेखील विचारत आहेत की जर काँग्रेस मुस्लिमांचे रक्षण करू शकत नाही तर आम्ही त्यांच्याबरोबर का आहोत.” रहीमवर हल्ला झाल्यानंतर ज्या रुग्णालयात त्याला नेण्यात आले होते, त्या रुग्णालयात भेट देताना त्यांच्यावर संतप्त कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याबद्दलही सांगितले.
एक महिन्यात तीन हत्या
जातीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात गेल्या महिन्यात तीन हत्या झाल्या आहेत. पहिल्या प्रकरणात एक स्थलांतरित कामगार अशरफची जमावाकडून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर अनेक गुन्हे दाखल असलेल्या हिंदुत्व कार्यकर्ते सुहास शेट्टीची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रहीमची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर पोलिसांनी जिल्ह्यात एका महिन्यात दुसऱ्यांदा प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत आणि ते शुक्रवारपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती दिली आहे.
रहीमच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी तीन तरुणांना अटक केल्याचे सांगितले. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात आले. परंतु, अद्याप त्यांना हत्येचे कारण कळलेले नाही. अटक करण्यात आलेले दीपक पुजारी (२१), पृथ्वीराज (२१) आणि चिरंथन (१९) हे बंटवाल तालुक्यातील रहिवासी आहेत आणि त्यांच्यावर खून, हत्येचा प्रयत्न आणि दंगलीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, आरोपींना त्यांच्या गुन्ह्याची किंमत भोगावी लागेल आणि याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
राज्य सरकारने दक्षिण कन्नड, उडुपी आणि शिवमोगा जिल्ह्यांमध्ये जातीय घटनांना आळा घालण्यासाठी ‘विशेष कृती दल’ स्थापन करण्याची सूचना दिली आहे. एका ग्राहकाच्या घराजवळ वाळू उतरवताना ३२ वर्षीय रहीमचा मृत्यू झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेला २९ वर्षीय कलंदर शफी आयसीयूमध्ये आहे. १ मे रोजी हिंदुत्व कार्यकर्ते शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जुलै २०२२ मध्ये सुरथकल येथे मोहम्मद फाझिल यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शेट्टी यांच्यावर पाच गुन्हे दाखल होते. १९ मे रोजी शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी नौशादवर मंगळुरू तुरुंगात दगडफेक करण्यात आली होती, ज्यानंतर त्याला म्हैसूर तुरुंगात नेण्यात आले.