Kamal Haasan Kannada Row: अभिनेता कमल हासन यांचा नवीन चित्रपट ‘ठग लाईफ’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्यांनी कन्नड भाषेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शनावर होण्याची चिन्हं आहेत. जोपर्यंत कमल हासन त्यांच्या विधानाबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार नाही, असा इशारा कर्नाटक फिल्म चेंबर्सने दिला आहे. कायदेशीररित्या कर्नाटक फिल्म चेंबर्सला या चित्रपटावर बंदी घालण्याचा अधिकार नाही. मात्र, हा मुद्दा कन्नड लोकांच्या भावना दुखावण्याबद्दल असल्याचे चेंबर्सच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. द्रमुकशी झालेल्या निवडणूक करारानंतर एमएनएम(मक्कल निधी मय्यम) नेते आणि अभिनेते कमल हासन राज्यसभेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले असतानाच कन्नड भाषेबद्दल त्यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणुका तोंडावर असताना हसन यांनी हा रोष ओढावून घेतल्याने त्याचा परिणाम त्यांच्या आगामी चित्रपटावरही होऊ शकतो.
“हा मुद्दा एखाद्या विशिष्ट अभिनेत्याचा किंवा भाषेचा चित्रपट प्रदर्शित करण्याबद्दल नाही. त्यांनी कर्नाटकातील सात कोटी लोकांच्या भावना दुखावल्या आणि अपमान केला आहे. जोपर्यंत कमल हसन माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज्यात त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार नाही”, असे केएफसीसीचे अध्यक्ष एन. एम. सुरेश यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे. कमल हासन यांचे विधान अनुचित आणि त्यांच्या दर्जाच्या चित्रपट निर्मात्याला शोभणारे नसल्याचेही त्यांनी म्हटले.
एन. एम. सुरेश म्हणाले की, “भारतीय स्पर्धा आयोगाच्या कायद्यानुसार केएफसीसीला कोणत्याही चित्रपटांवर बंदी घालण्याचा अधिकार नाही. भाषेसंबंधित वादात आपण थेट सहभागी होऊ शकत नाही. मात्र, हा मुद्दा त्या लोकांबद्दल आहे जे महसूल निर्माण करून देणारे आहेत. त्या लोकांचा अपमान अभिनेता कसा करू शकतो? म्हणूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे. शेवटी चित्रपटाबाबत काय करायचं हे जनतेने ठरवायचं आहे”, असेही ते म्हणाले. “कमल हासन यांना फक्त तेच बोलायचं आहे, जे चुकीचं विधान त्यांनी केलं आहे आणि त्याबाबत माफी मागायची आहे”, असेही ते पुढे म्हणाले.
कन्नड भाषेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर रोषाचा सामना करत असलेल्या कमल हासन यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांचा नवीन चित्रपट ‘ठग लाईफ’ राज्यात कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्रदर्शित होण्यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
चित्रपटसृष्टीतील लोकांचं म्हणणं काय?
अनेक कन्नड चित्रपट दिग्दर्शकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांशी संवाद साधला आहे. कमल हासन यांनी केलेले हे विधान अहंकारी असून त्यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे, असं मत त्यांनीही व्यक्त केलं आहे. “इतर कुठल्या नाही, पण हे कमल हासन यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याने केलेलं विधान आहे. हा मुद्दा आपल्या मातृभाषेबद्दल आहे, कन्नडबद्दल आहे आणि आपण त्यामुळे दुखावले गेले आहोत”, असे एका दिग्दर्शकाने सांगितले.
“हा मुद्दा इतका टोकाला नेण्याइतका गंभीर नाही. हसन जे म्हणाले ते केवळ चुकीचेच नाही तर मूर्खपणाचेदेखील होते”, असेही एका दिग्दर्शकाने सांगितले आहे. “कमल हासन हे काही भाषातज्ज्ञ वगैरे नाहीत. मात्र, त्यांनी केलेले विधान कन्नडवासीयांना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हते हेदेखील लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी ज्या प्रकारे हे विधान केले, ते किती अज्ञानी होते हे लक्षात येते. मला काळजी या गोष्टीची वाटते की, जर चित्रपट उद्योगातील कोणीही यावर मोकळेपणाने भाष्य केले तर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे प्रयत्न केले जातील”, असेही एका दिग्दर्शकाने म्हटले आहे.
“एक अभिनेता-राजकारणी म्हणून कमल हासन हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने बोलू शकले असते. तमिळ भाषा ही आई असल्याचं म्हणण्यापेक्षा तमिळ आणि कन्नड भावंडे आहेत असेही म्हणू शकले असते. जेव्हा आपण उत्तर भारताविरुद्ध लढतो तेव्हा संपूर्ण दक्षिण भारत एकत्र येतो. कमल हासन हे एक सुशिक्षित व्यक्ती आहेत. त्यांनी यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, कुवेम्पू, लंकेश पत्रिके वाचले आहे. तेव्हा त्यांचा हेतू कन्नडवासीयांना दुखावण्याचा नव्हता. मात्र, ते त्यांचं मत वेगळ्या प्रकारे मांडू शकले असते”, असेही एका दिग्दर्शकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
“कमल हासन यांच्यासारख्या व्यक्तीने भावना दुखावल्या आहेत, त्यांनी माफी मागण्याची खरंच गरज आहे”, असे एका वरिष्ठ मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडागी यांनी केएफसीसीला लिहिलेल्या पत्रात हासन यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. “अभिनेता असला तरी कर्नाटकातील लोक त्यांच्या जमीन, पाणी आणि भाषेबद्दलचा अपमान सहन करू शकत नाही”, असे तंगडागी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीदेखील या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “कन्नड भाषेचा इतिहास दीर्घ आणि सुप्रसिद्ध आहे. बिचारे कमल हासन यांना त्याची जाणीव नाही”, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या आधारे अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सीएमओच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
“सर्व कन्नड लोकांनी एकत्र येऊन या कन्नडवरील हल्ल्याविरुद्ध लढण्याची गरज आहे. कोणत्याही दर्जाचे असो, मोठे किंवा लहान, आमच्यासारख्या कन्नड लोकांना ज्यांचा जन्मच इथे झाला आहे ते अजिबात हे खपवून घेणार नाहीत. कर्नाटक हे एकमेव राज्य आहे, जिथे दुसऱ्या भाषेतील चित्रपट मग तो तमिळ असो, तेलुगु किंवा मल्याळम असो; या चित्रपटांचे स्वागत फुलांच्या हारांनी आणि थिएटर सजवून केले जाते. याच भूमीचा अपमान केला गेला. कमल हासन यांनी त्यांच्या विधानाने फक्त कन्नड भाषिकांनाच नाही तर इतर भाषिकांनाही दुखावले आहे, फक्त माफी मागण्याची गरज आहे”, असे केएफसीसीचे अध्यक्ष सुरेश यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी राज्यसभा निवडणुकांमुळे मोठ्या राजकीय चर्चा रंगत आहेत. दुसरीकडे, कमल हासन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड भाषिक दुखावले गेले. याचा परिणाम कमल हासन यांच्या राजकीय कारकिर्दीवर होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.