अमरावती : राज्‍यात स्‍थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार दर्शविला आहे. मात्र घटक पक्षांच्या नेत्यांकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्या दाव्यांमुळे महायुतीत संघर्ष अटळ मानला जात आहे.

भाजप महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, अशी घोषणा माजी खासदार नवनीत राणा यांनी केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला खरा, पण आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची मात्र अडचण झाली आहे. अद्याप रवी राणा यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केलेली नाही. भाजपला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे ते सांगतात. बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपने त्यांना समर्थन दिले होते. आता महापालिकेच्या निवडणुकीत रवी राणा यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संजय खोडके यांनी रवी राणांसोबत जुळवून घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना अलिप्ततेचे संकेत दिले आहेत.

राणा विरूद्ध खोडके हा संघर्ष अमरावतीकरांसाठी नवा नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी खोडके यांनी महायुतीत असूनही नवनीत राणा यांना विरोध केल्याचे राणा यांच्या गटाचे म्हणणे होते. नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सूड म्हणून नवनीत राणा यांच्या गटाने अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता यांना बळ दिल्याचे म्हटले गेले. राणा आणि खोडके दाम्पत्य महायुतीत असूनही स्थानिक पातळीवर उघडपणे परस्परांच्या विरोधात भूमिका घेतात, याचे त्यांच्या समर्थकांना आश्चर्य वाटत नाही.

आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राणा आणि खोडके यांना आपली शक्तीस्थळे मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. महायुतीत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय होवो, राणा आणि खोडके यांच्यात मतैक्य होणे अशक्य मानले जात आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ८७ पैकी ४५ जागा जिंकून एकहाती बहुमत मिळवले होते. युवा स्वााभिमान पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी संजय खोडके हे काँग्रेसमध्ये होते, तर माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख हे भाजपमध्ये होते. काँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. गेल्या आठ वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये आहेत, तर संजय खोडके यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. पराभूत होऊनही त्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान आहे. आगामी महापालिका निवडणूक ही त्यांच्या नेतृत्वात लढली जाईल. माजी विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे हे शहराध्यक्ष होते. त्यांना या पदावरून हटविण्यात आले. पोटे यांच्या गटासाठी हा धक्का होता. आता हा गट महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घेतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे.