LS Election 2024 : ताठ केलेली कॉलर आणि मागच्या बाजूस वडिलांचा फोटो… या पार्श्वभूमीवर अत्यंत आत्मविश्वासाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीबाबत हुंकार भरला आहे. द्रमुक पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे सुपुत्र असलेल्या स्टॅलिन यांनी २०२४ ची ही निवडणूक म्हणजे ‘स्वातंत्र्याची दुसरी लढाई’ असल्याचं म्हटलं आहे. आपल्या वडिलांसारखाच जादुई करिष्मा दाखवत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलेलं यश असो किंवा त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील भरघोस यश असो, स्टॅलिन (वय ७४) हे ‘इंडिया’ आघाडीसाठी तमिळनाडूचा मुख्य चेहरा आहेत.

दक्षिणेत घुसखोरी करणं भाजपासाठी अवघड आहे. मात्र, केंद्रातील भाजपाचं वर्चस्व मोडीत काढणं गरजेचं असल्याची कल्पना त्यांना आहेच. म्हणूनच, ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांवर आपली सडेतोड मतं व्यक्त केली आहेत. भाजपाच्या राजकारणाविरोधात शड्डू ठोकून लढाईसाठी उभ्या ठाकलेल्या नेत्यांचं कौतुक करताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही नाव घेतलं आहे. अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी अशी तरुण नेत्यांची फौज इंडिया आघाडीकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपाच्या या हुकूमशाही राजकारणाविरोधात रणशिंग फुंकताना त्यांनी विविध प्रश्नांवर काय मते व्यक्त केली आहेत, ते पाहूयात.

तुम्ही लोकसभेच्या अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. मात्र, भाजपाविरोधी आघाडीचं तमिळनाडूमध्ये नेतृत्व करत असताना या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता?

आपण स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईच्या मध्यावर आहोत, असं वाटतंय. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्याचे तत्त्व आणि विविधतेतील एकता या आपल्या घटनेतील गाभा असलेल्या घटकांना वाचवण्याची ही लढाई आहे. द्रमुक पक्ष इंडिया आघाडीसोबत आहे आणि आम्ही भाजपाच्या या हुकूमशाही सत्तेविरोधात लढून आपली लोकशाही वाचवण्यासाठी कटीबद्ध आहोत. जेव्हा मी द्रमुक पक्षाच्या युवा विभागाचं नेतृत्व करायचो, तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी म्हणायचो की, ‘करा किंवा मरा.’ आणि जे करायचं ठरवलं आहे ते आम्ही करून दाखवू याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही. ही निवडणूक आमच्यासाठी फक्त एक महत्त्वाची निवडणूक नाही, तर ती त्या आधीही भारतीय लोकशाहीसाठीच ‘करा किंवा मरा’ची निवडणूक आहे. मात्र, आमच्याकडेही मजबूत गट आहे. अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांसारखे नेते आमच्यासोबत आहेत. काळाची गरज पाहता आम्ही सगळे या लढाईत एकजुटीने लढत आहोत.

हेही वाचा : वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार ‘अशी’ घेतात आपल्या आरोग्याची काळजी

केंद्रातील काही मंत्रिपदं, या पलीकडे जाऊन द्रमुकने राष्ट्रीय स्तरावर एखादी महत्त्वाची भूमिका बजावण्याचा कधी विचार केलाय का?

आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, भारतीय राजकारणातील द्रमुकची भूमिका ही केंद्रामधील फक्त काही मंत्रिपदं मिळवणं एवढ्यापुरती मर्यादित नाही. आमचा प्रभाव हा ऐतिहासिकदृष्ट्या फारच महत्त्वाचा राहिला आहे; विशेषत: कलायंगार यांच्या नेतृत्वाखाली! व्ही. पी. सिंह, एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल आणि मनमोहन सिंह यांसारख्या पंतप्रधानांची निवड असो, वा राष्ट्रीय नेतृत्वाला आकार देणं असो; यामध्ये द्रमुकची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.

आमची बांधिलकी ही नेहमीच राष्ट्र कल्याणाशी राहिली आहे. उदाहरणार्थ, १९७१ चा इंदिरा गांधींचा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय असो, १९७५ साली आणीबाणीच्या विरोधात उभं राहणं असो, १९७७ मध्ये जनता सरकारमधील महत्त्वाची भूमिका असो, १९८९ मधील राष्ट्रीय आघाडी असो, १९९६ मधील संयुक्त आघाडी असो; या सगळ्यांमध्ये आमची भूमिका महत्त्वाची होती. इतकंच काय, आम्ही अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी १९९९ मध्ये किमान समान कार्यक्रमाअंतर्गत वाजपेयी सरकारलाही पाठिंबा दिला होता. त्यानंतर २००४ सालीही संयुक्त पुरोगामी आघाडीमध्येही आमची भूमिका ताकद पुरवण्याची होती.

मात्र, द्रमुकने आजवर पंतप्रधानसारख्या मोठ्या पदासाठी कधीच धडपड का केलेली नाहीये?

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानपदसुद्धा कलायंगार यांच्या आवाक्यात सहज होते, त्यांना ते मिळालंही असतं. मात्र, ते नम्रपणे म्हणाले की, ‘मला माझी उंची ठाऊक आहे.’

मात्र, आपण याकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको की, भारताच्या एकूण राजकीय क्षितिजावर कलायंगार आणि द्रमुक पक्ष हा हिमालयाच्या उंचीएवढा महत्त्वाचा राहिला आहे. आमच्यासाठी हा फक्त सत्तेचा वा पदाचा प्रश्न नाहीये; तर आमच्यासाठी संघराज्याची पाठराखण, धर्मनिरपेक्षता, द्वेष-मुक्त भारत, विविधतेचा सन्मान आणि प्रत्येक भाषेला तितकाच आदर या साऱ्या मूल्यांची पाठराखण हे आमचं राजकारण आहे.

सध्या पक्षांकडून विचारधारेला गुंडाळून ठेवलं जात आहे आणि लोकदेखील मजबूत, ताकदवान नेत्यांकडे अधिक झुकत असल्याचं दिसतंय, याकडे तुम्ही कसं पाहता?

दर पिढ्यांगणिक राजकीय विचारधाराही नव्याने उदयास येत असते. एखाद्या तरुण नेत्यासाठी हे फार महत्त्वाचं ठरतं की, त्याने वैचारिक बांधिलकीच्या माध्यमातून या नव्या तरुण पिढीला आपल्याकडे वळवून घ्यावं. याचं प्रमुख उदाहरण द्राविडीयन चळवळ हेच आहे. ती अगदी पेरियारांपासून कलायंगार यांच्यापर्यंत तेव्हापासून ते आतापर्यंत चालते आहे. मला याची जाणीव आहे की, वेळ बदलत राहते. मात्र, काही मूलभूत मूल्ये जसे की, सामाजिक न्याय, समानता, राज्यांचे अधिकार आणि भाषेबाबतचे ममत्त्व या गोष्टी तशाच राहतात.

मात्र, दुसरीकडे भाजपा या पक्षाचा खेळ फार वेगळा आहे. ते धार्मिक भावनांचं, द्वेषाचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचं मिश्रण राजकारणात करू पाहत आहेत. सध्या मोदी हा त्यांचा चेहरा आहे. काल कुणीतरी वेगळा होता आणि उद्या कदाचित कुणीतरी दुसराच असेल. मुळात, भाजपाची पंतप्रधानांसाठीची रणनीती ही या लार्जर-दॅन-लाइफ व्यक्तिमत्त्वाची रचना करण्यावर अवलंबून आहे.

हेही वाचा : रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

मात्र, भाजपाचं जे यश सध्या दिसून येतंय, त्यामध्ये मोदींची एकमेव नेता म्हणून असलेली प्रतिमा अधिक कारणीभूत आहे की हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रभावी आहे?

ते मोदींना ‘विश्वगुरु’ वगैरे म्हणू शकतात. मात्र, तमिळनाडूसारख्या राज्याबाबतची त्यांची उदासीनता पाहता किंवा सीमेवर चीनसोबत जो वाद सुरू आहे, त्याकडे पाहता त्याबाबत असलेले त्यांचे मौन बरंच काही सांगून जाते. ते काही ‘विश्वगुरु’ वगैरे नाहीयेत. येत्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींसारखा चैतन्यमयी तरुण नेताच मोदींच्या या प्रतिमेला आणि आरआरएसच्या या मिथकाला धक्का देणार आहे.

२०१९ पासून तमिळनाडूमध्ये यशस्वी पद्धतीने आघाडी टिकवून ठेवू शकण्यामागचं श्रेय तुम्ही कशाला देता?

२०१८ मध्ये जेव्हा आम्ही एकत्र आलो, तेव्हाही ती आमच्यासाठी फक्त राजकीय सोय नव्हती तर आमची युती ही समान मूल्यांवर आधारित होती. हुकूमशाही प्रवृत्तींपासून भारतीय लोकशाहीने दिलेले मूलभूत अधिकार आणि आपली संवैधानिक चौकट टिकवून ठेवण्यासाठी लढा देणं आमच्या एकत्र येण्यामागचा विचार होता. त्याच विचाराने आम्हाला २०१९ पासून आतापर्यंत एकत्र ठेवलं आहे.

तुम्ही सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कामकाजावर टीका केली आहे, त्याबद्दल अधिक काय सांगाल?

‘इंडियन एक्स्प्रेस’नेच शोधकार्य करून हे लोकांसमोर आणलंय की, जेव्हा एखादा विरोधी पक्षातला नेता भाजपाच्या गोटात जातो, तेव्हा त्याच्या मागे लागलेला केंद्रीय यंत्रणांचा हा ससेमिरा आपोआप नष्ट होतो. यावरूनच हे दिसून येतं की, कशाप्रकारे मोदींच्या दहा वर्षांच्या सत्तेने भारतातील या उच्चतपास यंत्रणांची वाट लावली आहे. म्हणूनच मोदींचा परिवार सध्या ‘ED-IT-CBI’चा परिवार म्हणून ओळखला जातोय.

गेली दहा वर्षे सत्तेत राहूनही आपण काय काय साध्य केलं हे दाखवून देण्याऐवजी हे मोदी सरकार आताही भूतकाळातील मढी उकरून काढत आहे. ते आताही पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांसारख्या मातब्बर नेत्यांवर टीका करत बसले आहेत आणि त्यांचा आताचा अजेंडा तरी काय आहे? तर विरोधकांवर सतत पाळत ठेवणं, त्यांना हैराण करण्यासाठी वाट्टेल तो मार्ग वापरणं, इतकंच काय विरोधकांच्या अटकेवर निवडणूक आयोगही चिडीचूप आहे.

मोदी परिवारातील अलीकडची भर काय आहे? तर ‘आरटीआय’ (Right to Information Act). कारण त्यांना अशी भीती आहे की, लोक इथून पुढे मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून त्यांनी आता आरटीआयचा वापर सुरू केला आहे. अलीकडेच एका आरटीआयच्या उत्तरातून भाजपाने लावून धरलेला कच्छथीवूचा मुद्दा हे याचंच उदाहरण आहे.