उमाकांत देशपांडे

मुंबई : विधानसभेत यंदा आगामी पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेताच नसण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, त्यांचे प्रतोद (व्हीप) कोण, याबाबत निर्णय झाल्यावरच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करून आग्रह धरला, तरच विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, अन्यथा पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेतेपदाविनाच पार पडण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्याने आता हे पद रिक्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवार यांनी ४२ आमदारांचा पाठिंब्याचे पत्र दिल्याचा दावा केला जात असला तरी काही आमदारांची चलबिचल सुरू असल्याने विधानसभा सभागृह किंवा अध्यक्षांपुढे सुनावणीत किती आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे, हे सिद्ध व्हावे लागणार आहे. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली असली, तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, यावर निर्णय होण्यासाठी आधी सर्वांना बाजू मांडण्यासाठी नोटीसा व नंतर सुनावणी होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा… जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला सांगलीतूनच आव्हान

हेही वाचा… पश्चिम विदर्भात पक्षाच्या पुनर्बांधणीचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी अधिवेशनाआधी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला, तरी तो मान्य करायचा की नाही, हे अध्यक्षांच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फूट व संख्याबळाचा निर्णय होईपर्यंत विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबितही ठेवला जाऊ शकतो. विरोधी पक्ष नेता सभागृहात नसणे आणि विरोधी पक्ष विस्कळीत असणे, हे सत्ताधारी पक्षांच्या राजकीय फायद्याचेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ राहिलेले नाही, हे उघड आहे. त्यांनी या पदावरचा दावा सोडला आणि काँग्रेसला हे पद मिळावे, यासाठी सर्व विरोधकांनी एकजूट दाखवून आग्रह धरला, तरच अध्यक्ष या पदाबाबत निर्णय घेतील. अन्यथा विरोधी पक्षांमधील दुहीचा फायदा घेण्याची व विरोधी पक्षनेतेपदाविनाच अधिवेशन पार पडावे, अशी रणनीती भाजपने आखली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.