Odisha Assembly Election: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे येत्या विधानसभेची निवडणूक दोन जागांवरून लढवणार आहेत. ओडिशामध्ये विधानसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांबरोबरीने होणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या हिंजली जागेबरोबरच कांताबंजी जागेवरूनही निवडणूक लढणार आहेत. हा मतदारसंघ राज्याच्या पश्चिम भागामध्ये आहे.

दोन जागांवरून लढण्याचा निर्णय कशासाठी?

पटनाईक यांनी असा निर्णय का घेतला असावा, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याबाबत बोलताना पक्षातील काही लोकांनी अशी माहिती दिली आहे की, राज्याच्या पश्चिम भागामध्ये वाढत असलेला भाजपाचा प्रभाव पाहता त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. किनारपट्टी आणि दक्षिणेकडील प्रदेशांच्या तुलनेत पश्चिम भागात बिजू जनता दलाचा प्रभाव कमकुवत आहे. या भागाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचे पटनाईक यांना दाखवून द्यायचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पश्चिम ओडिशा भागाअंतर्गत लोकसभेच्या पाच आणि विधानसभेच्या ३५ जागा येतात. कांताबंजी ही जागा बालनगीर लोकसभा जागेअंतर्गत येते.

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
EVM
“निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा”, EVM वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलं!
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uday samant kiran samant narayan rane
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून भाजपाच्या नारायण राणेंना उमेदवारी; उदय सामंत म्हणाले, “आम्ही राजकारणातून…”

हेही वाचा : भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवाराची का होतेय कोंडी?

याआधीही घेतला आहे असाच निर्णय!
पटनाईक यांनी ओडिशाच्या पश्चिम भागातून लढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा असा निर्णय घेतला होता. या भागात भाजपाच्या वाढत्या प्रभावाला सुरुंग लावणे हेच त्यामागचे कारण होते. मात्र, त्यावेळी त्यांनी हिंजलीऐवजी बारगढ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या बीजेपूरची निवड केली होती. अर्थातच, त्यांना दोन्हीही मतदारसंघांमध्ये विक्रमी मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा पारंपरिक बाल्लेकिल्ला शाबूत ठेवून बीजेपूरची जागा रिकामी केली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रभाव

भाजपाने २०१९ मध्ये ओडिशामधील लोकसभेच्या सर्व पाचच्या पाच जागा जिंकल्या होत्या. मात्र, पश्चिम ओडिशामधूनही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा पटनाईक यांचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला आणि त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लीलया निर्णायक बहुमत मिळाले. ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याकारणाने दोन्हीही निवडणुकांसाठीची रणनीती फार विचारपूर्वक आखावी लागते. नवीन पटनाईक याचाच विचार करून गेल्या निवडणुकीपासून दोन मतदारसंघात लढण्याचा निर्णय घेतात.

याबाबत बोलताना बिजू जनता दलाचे नेते प्रसन्न आचार्य यांनी म्हटले आहे की, “राज्याचे मुख्यमंत्री हे काही एखाद्या मतदारसंघापुरते मर्यादित नाहीत. ते ४.५ कोटी लोकांचे प्रतिनिधी आणि नेते आहेत. १४७ मतदारसंघातल्या लोकांना असे वाटते की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेसाठी त्यांचे प्रतिनिधित्व करावे. मात्र, कायद्यानुसार ते एका जागेचेच प्रतिनिधित्व करू शकतात. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ते सगळ्या मतदारसंघासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते.”

काय आहे मतदारसंघाचा इतिहास?

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यंदाची निवडणूक ज्या कांताबांजी मतदारसंघातून लढवत आहेत, त्या जागेवर आमदार संतोष सिंह सालुजा यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपाचे लक्ष्मण बाग यांचेही आव्हान तिथे असणार आहे. गेल्या निवडणुकीत ते अत्यंत कमी फरकाने या जागेची निवडणूक हरले होते. गेल्या निवडणुकीमध्ये या जागेवर लक्ष्मण बाग यांना ६४,११८ मते (३३.५३ टक्के) मिळाली होती. फक्त ११८ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे, सत्ताधारी बिजू जनता दलाचे उमेदवार अजय कुमार दास यांना ५४,५२७ मते (२८.५१ टक्के) मिळाली होती.

हेही वाचा : New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात

कांताबांजीमध्ये पंजाबी आणि मारवाडी मतदारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे संतोष सिंह सालुजा आणि बिजू जनता दलाचे उमेदवार आयुब खान यांच्यातच २००० पासून तगडी टक्कर पहायला मिळते. या जागेच्या भौगोलिक स्थितीचा आढावा घेता विधानसभेचा हा मतदारसंघ शेजारील राज्य छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे. तसेच तो बालंगीर आणि कालाहंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये येतो. या जागेच्या भौगोलिक स्थानामुळेही हा मतदारसंघ धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतो. याबाबत बोलताना बिजू जनता दलाच्या एका नेत्याने असे म्हटले आहे की, “छत्तीसगडमधील भाजपाच्या लाटेचा प्रभाव या जागेवर पडण्यापासून रोखला जाईल, अशी मुख्यमंत्र्यांना आशा आहे.”

नवीन पटनाईक यांनी २००० पासून ओडिशामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पटनाईक हे आस्का लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या हिंजली विधानसभा जागेचे प्रतिनिधित्व करतात. या दोन्ही विधानसभेच्या जागांसाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.