सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्येही राजकीय नाट्य चांगलेच रंगात आले आहे. नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएबरोबर जाणे पसंत केल्याने बिहारमधील राजकीय गणिते पुन्हा एकदा विस्कटून गेली आहेत. बिहारच्या राजकारणातील आणखी एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे राष्ट्रीय जनता दल (RJD) होय. या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल ४० पैकी २३ जागांवर निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीसाठीची त्यांची रणनीती काय असणार आहे, ते समजून घेऊयात.

मुस्लीम आणि यादव हा पारंपरिक मतदार

राष्ट्रीय जनता दल (राजद) या निवडणुकीसाठीही आपले जुनेच सूत्र वापरणार आहे, असे दिसून येत आहे. मुस्लीम आणि यादवांवर त्यांची भिस्त आहे. पक्षाने आठ यादव, दोन मुस्लीम, तर १२ ओबीसी उमेदवार दिले आहेत. एकूण जाहीर केलेल्या २२ जागांपैकी तीन उमेदवार हे अनुसूचित जाती आणि अतिमागासवर्गीय आहेत, तर दोन उमेदवार हे उच्च जातीचे दिले आहेत.

‘महागठबंधन’ म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राजदने २३ पैकी २२ जागांवरील उमेदवार जाहीर केले असून सिवान या जागेवरील उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. या जागेवर माजी सभापती अवध बिहार चौधरी किंवा मृत माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांच्या पत्नी हिना साहब यांना उमेदवारी मिळू शकते.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब

महागठबंधनमधून मिळाल्या २३ जागा

राष्ट्रीय जनता दल सुरुवातीला २६ जागांवर निवडणूक लढवणार होता. मात्र, जागावाटपामध्ये त्यांनी आपल्या वाटणीच्या तीन जागा या मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टी (VIP) ला देऊ केल्या. बिहारमध्ये १९ एप्रिल ते १ जून अशा सातही टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

सहा महिलांना दिली उमेदवारी

राष्ट्रीय जनता दलाने एकूण सहा महिलांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलेले आहे. यामध्ये शेओहरमधून रितू जैस्वाल, मुंगेरमधून अनिता देवी महतो, पूर्णियामधून विमा भारती, जमुईमधून अर्चना रविदास यांना उमेदवारी आहे; तर राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांच्या दोन्हीही मुली निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी मिसा भारती या पाटलीपुत्रमधून, तर रोहिणी आचार्य या सारणमधून उमेदवार आहेत.

शेओहरमधून उमेदवारी मिळालेल्या रितू जैस्वाल यांचे सिंघवाहिनी गावच्या सरपंच म्हणून भरपूर कौतुक झाले आहे. त्या एका IAS अधिकाऱ्याची पत्नी आहेत. या अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे मुंगेरमधून उमेदवारी मिळलेल्या अनिता देवी महतो या राजकारणात असलेल्या अशोक महतो यांच्या पत्नी आहेत.

राष्ट्रीय जनता दलाने आठ विद्यमान आमदारांनाही उमेदवारी देऊ केली आहे. यामध्ये बोधगयाचे आमदार कुमार सर्वजीत यांना गयामधून, रामगढचे आमदार सुधाकर सिंह यांना बक्सरमधून, सिंहेश्वरचे आमदार चंद्रहास चौपाल यांना सुपौलमधून, जोकीहाटचे आमदार शाहनवाज आलम यांना अररियामधून, बेलागंजचे आमदार सुरेंद्र प्रसाद यादव यांना जहानाबादमधून, उजियारपूरचे आमदार आलोक कुमार मेहता यांना उजियारपूरमधून आणि आमदार ललित यादव यांना दरभंगामधून उमेदवारी मिळाली आहे. उमेदवार अली अशरफ फात्मी यांना मधुबनी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय जनता दलाची यादव जातीच्या नागरिकांवर मोठी भीस्त आहे. पक्षाने पाटलीपुत्र (मिसा भारती), सारण (रोहिणी आचार्य), दरभंगा (ललित यादव), सीतामढी (अर्जुन राय), बंका (जयप्रकाश नारायण), वाल्मिकी नगर (दीपक यादव) आणि मधेपुरा (कुमार चंद्र दीप) या ठिकाणी यादवांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

अतिमागासवर्गीयांना आपलेसे करण्याचा प्रयत्न

पक्षाला यादव आणि मुस्लीम यांच्या पलीकडे जाऊन आपला विस्तार करायचा आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे लक्ष्य सध्या कुशवाह आणि कुर्मी (लव-कुश) यांच्यावरही आहे. आपल्या उमेदवार यादीमध्ये या दोन्ही जातींना पक्षाने प्राधान्याने प्रतिनिधित्व दिले आहे. उझियारपूरमधून मेहता, श्रावण कुशवाह यांना नवाडामधून आणि अभय कुशवाह यांना औरंगाबादमधून उमेदवारी दिली आहे. हे तीन कोरी (ओबीसी) जातीचे आहेत, तर अनिता देवी या अतिमागासवर्गीय असून त्यांनी ओबीसी कुर्मीशी विवाह केला आहे. त्यांनाही उमेदवारी मिळाली आहे.

इतर अतिमागासवर्गीय उमेदवार मुंगेर, सुपौल आणि पूर्णियामधून रिंगणात आहेत, तर जमुई, गया आणि हाजीपूर (शिवचंद्र राम) मधून दलित समाजाचे उमेदवार उभे केलेले आहेत. उच्च जातीच्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगानंद सिंग यांचा मुलगा सुधाकर सिंग आणि वैशालीमधील विजय कुमार शुक्ला ऊर्फ मुन्ना शुक्ला यांचा समावेश आहे.