पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांत दाखल होत आहेत. परंतु, या शिष्टमंडळातील नेत्यांमध्येच आता वाद झाल्याचे चित्र आहे. या वादाचे कारण म्हणजे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळ सरकारवर केलेली टीका. २०२३ मध्ये भूकंप झाल्यानंतर सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने तुर्कियेला दिलेल्या आर्थिक मदतीवरून हा वाद निर्माण झाला आहे. शशी थरूर नक्की काय म्हणाले? हा वाद आहे तरी काय? जाणून घेऊ…
शशी थरूर यांचे केरळ सरकारवर टीकास्त्र
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दोन वर्षांपूर्वी सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखालील केरळ सरकारने तुर्कियेला दिलेल्या १० कोटी रुपयांच्या मदतीला ही उदारता चुकीची असल्याचे म्हटले; तर सीपीआय (एम)चे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी थरूर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी विविध देशांमध्ये पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळांमध्ये थरूर आणि ब्रिटास या दोघांचाही समावेश आहे. शशी थरूर अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील व कोलंबियाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत. तर सीपीआय (एम)चे राज्यसभेतील संसदीय पक्षाचे नेते ब्रिटास हे जेडेयू नेते संजय झा यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य आहेत. हे शिष्टमंडळ जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया व इंडोनेशियाला जात आहे.
भारताबरोबरच्या संघर्षात पाकिस्तानने तुर्कियेमध्ये विकसित करण्यात आलेल्या ड्रोनचा वापर भारताच्या विरोधात केला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये शशी थरूर म्हणाले, “दोन वर्षांनंतर तुर्कियेचे वर्तन पाहून केरळ सरकार त्यांच्या चुकीच्या उदारतेवर विचार करेल, अशी मला आशा आहे! वायनाडचे लोक त्या १० कोटी रुपयांचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करू शकले असते, हे सांगायला हरकत नाही.” थरूर यांनी जुलै २०२४ मध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील वायनाड येथे झालेल्या विनाशकारी भूस्खलनाचा उल्लेख केला. त्यात सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाला आणि जिल्ह्यातील तीन गावांचा भाग उद्ध्वस्त झाला.
शशी थरूर यांच्या टीकेला प्रत्युत्तर
जॉन ब्रिटास पिनारायी विजयन सरकारवर केलेल्या टीकेबद्दल थरूर यांच्यावर आक्रमक झाले. आपल्या प्रत्युत्तरात ब्रिटास म्हणाले, “शशी थरूर यांच्याबद्दल खूप आदर आहे; पण या टिप्पण्या म्हणजे स्मृतिभ्रंशाची लक्षणे आहेत. नरेंद्र मोदी सरकारने तुर्कियेला मदत करण्यासाठी स्वतः ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले होते. हे त्यांना माहीत असताना त्यांनी केरळला कमी का लेखले असावे, हे गोंधळात टाकणारे आहे. केरळवर टीका करणे चुकीचे आहे.” २०२३ मध्ये तुर्किये आणि सीरियामध्ये मोठा भूकंप झाला होता. त्या भूकंपानंतर तुर्किये आणि सीरियाला मदत पाठविण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले होते. त्याअंतर्गत भारताने मदत साहित्य, बचाव कर्मचारी आणि इतर साहित्य पाठविले होते आणि केंद्राकडून केरळ सरकारला तुर्कियेला १० कोटींची मदत पाठविण्यास मंजुरी मिळाली होती.
केरळने तुर्कियेला दिलेल्या मदतीवर थरूर यांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करीत सीपीआय (एम) नेते व राज्याचे अर्थमंत्री के. एन. बालागोपाल यांनी म्हटले, “ही चुकीची उदारता नाही. मोठ्या आपत्तीच्या वेळी आम्ही मानवी दृष्टिकोन स्वीकारला. ही मदत भारतीय परराष्ट्र मंत्रालयामार्फत तुर्कियेला देण्यात आली. २०२३ च्या कार्याला २०२५ च्या तणावाशी जोडणे चुकीचे आहे. २०२३ मध्ये राज्याने मानवतावादी आधारावर तुर्कियेला मदत केली. दोन वर्षांनंतर, तुर्कियेला केलेल्या त्या मदतीचा चुकीचा अर्थ लावणे हा दृष्टिकोन चुकीचा आहे.”
वायनाड भूस्खलन
शशी थरूर वायनाड भूस्खलनावर बोलले. त्यांनी तुर्कियेला दिलेला निधी राज्य स्वतः वापरू शकले असते, असे म्हटले. कारण- केरळ सरकारने भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून वायनाड येथील पुनर्बांधणीच्या प्रयत्नांसाठी २,००० कोटी रुपयांची मदत मागितली होती. त्यानंतर लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (केरळ) सरकारने वायनाड पीडितांकरिता विशेष पॅकेज न दिल्याबद्दल केंद्रावर आरोपही केले होते. केंद्राने जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाचा निषेध करीत सीपीआय (एम) सध्या वायनाडमध्ये मोर्चे काढत आहे.
७ ते १० मे यादरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनवरून तुर्कियेविरोधात भारतीय नागरिक आक्रमक झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्हाला अपेक्षा आहे की, तुर्किये पाकिस्तानला सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवेल आणि दशकांपासून त्यांनी जोपासलेल्या दहशतवादाविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती करेल. देशांचे संबंध एकमेकांच्या चिंतांविषयी असणाऱ्या संवेदनशीलतेच्या आधारावर बांधले जातात.”