Shashi Tharoor on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हेदेखील यापैकी एका शिष्टमंडळाचा भाग आहेत. पाकिस्तानची पोलखोल करून ते परदेशात भारताची बाजू भक्कमपणे मांडताना दिसून येत आहेत. मात्र, आता थरूर यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. नेमकं काय आहे यामागचं कारण? शशी थरूर हे भाजपासाठी फायदेशीर आणि काँग्रेससाठी अडचणीचे ठरत आहेत का? हे जाणून घेऊ…

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करून केंद्र सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची क्लिप शेअर करीत “भारताला पाकिस्तानशी का जोडले गेले आहे? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाकडून आपल्याला पाठिंबा का दिला गेला नाही? ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘मध्यस्थी’ करण्यास कोणी सांगितले?”, असे प्रश्न उपस्थित केले. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या पोस्टमध्ये परराष्ट्रमंत्र्यांचा उल्लेख ‘जे जे’ असा केला. राहुल गांधींच्या या पोस्टवर भाजपाने नाराजी व्यक्त करीत त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला.

शशी थरूर यांच्याकडून केंद्र सरकारचं कौतुक

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी हे ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारला प्रश्न विचारत असताना दुसरीकडे खासदार शशी थरूर हे या मोहिमेचं कौतुक करताना दिसून येत आहेत. पनामा दौऱ्यावर गेलेल्या केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असताना शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. उपस्थितांना भारताच्या मोहिमेची माहिती देताना थरूर म्हणाले, “भारतीय भूभागाला लक्ष्य करून पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत; पण आता दहशतवाद्यांना त्यांच्या भ्याड हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. उरी येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने सप्टेंबर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता.”

आणखी वाचा : Maharashtra Politics : स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस-ठाकरे गटाचे नेते आमनेसामने, महाविकास आघाडीत काय घडतंय?

थरूर म्हणाले, यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं

पुढे बोलताना शशी थरूर म्हणाले, “२०१६ मध्ये भारताने पहिल्यांदाच भारत व पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषा ओलांडली होती. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. कारगिल युद्धावेळीही भारताने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यावेळी भारतीय जवानांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भारताने केवळ नियंत्रण रेषाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून एक पाऊल पुढे टाकले होते.” दरम्यान, शशी थरूर यांच्या तोंडातून केंद्र सरकारचं कौतुक होत असल्याने काँग्रेसच्या नेते त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

शशी थरूर काँग्रेससाठी अडचणीचे?

१४ मे रोजी झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार शशी थरूर यांच्या भूमिकेवर चर्चा केली होती. केंद्र सरकारचं वारंवार कौतुक करून थरूर हे लक्ष्मण रेषा मोडत असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिली होती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची विधाने पक्षाशी विसंगत असल्याचा आरोपही त्यावेळी करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात थरूर यांची निवड झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. “केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होणारे खासदार सर्वप्रथम त्यांच्या पक्षनेतृत्वाची परवानगी घेतात. ही लोकशाहीची एक चांगली परंपरा आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, थरूर यांनी सरकारचा प्रस्ताव स्वीकारणे हे पक्षासाठी एक आव्हानात्मक चित्र असल्याचं दिसतंय. अनेक तक्रारी असूनही, काँग्रेस नेतृत्वाकडून शशी थरूर यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही”, असं जयराम रमेश म्हणाले होते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या सभेत भाजपा मंत्र्याला प्रवेश का नाकारण्यात आला? नेमकं काय आहे यामागचं कारण?

“शशी थरूर हे भाजपाचे सुपर प्रवक्ते”

दरम्यान, पनामा दौऱ्यावर असताना खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानवर टीका करीत केंद्र सरकारचं कौतुक केल्यानंतर काँग्रेसचे नेत्यांनी यावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली. काँग्रेस नेते उदित राज यांनी थरूर यांना चक्क भाजपाचा सुपर प्रवक्ता असं संबोधलं. ते म्हणाले, “शशी थरूर हे भाजपाचे सुपर प्रवक्ते आहेत. भाजपाच्या लोकांना जेवढं बोलता येत, मोदींची चमचेगिरी, त्यांचे गुणगान करता येत नाही, तेवढं शशी थरूर करीत आहेत. यापूर्वीही सर्जिकल स्ट्राईक होत होत्या; पण सर्वसामान्य जनतेला त्याबद्दल काहीच माहीती नव्हते. केंद्र सरकार भारतीय सैन्यदलाच्या कारवाईचा राजकीय फायदा घेत आहे. काँग्रेस पार्टीने असे कधीही केले नाही. शशी थरूर यांचा हा पब्लिसिटी स्टंट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशी थरूर यांचं टीकाकारांना प्रत्युत्तर

काँग्रेस प्रवक्त्याने भाजपाचे सुपर प्रवक्ते असं संबोधल्यानंतर खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “मी भारत-पाकिस्तान यांच्यातील पूर्वीच्या युद्धाबद्दल नव्हे तर फक्त पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईबद्दल बोललो आहे. तरीही टीकाकारांना माझे शब्द चुकीच्या पद्धतीने मांडायचे असल्यास त्यांचे स्वागत आहे. माझ्याकडे अनेक महत्वाची कामे आहेत. त्यामुळे टीकाकारांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. काही लोकांना माझ्या कथित अज्ञानावर टीका करायची असेल तर ते करतील”, असं खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे.