वसई- लोकसभेपाठोपाठ विधानसभेत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव केल्यानंतर भाजप आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला महापालिकेत धक्का देण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी भाजपाने रणनीती आखून बविआवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे पराभवाने खचलेली बविआ आता अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. पराभवाने धोक्याचे संकेत मिळाल्यानंतर बविआने आपल्या दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांना महापालिकेत उतरविण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनाही लोकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडून लोकांमध्ये जाण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.

बहुजन विकास आघाडीच्या इतिहासातील सर्वात दारूण पराभव यंदाच्या विधानसभेत झाला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आणि आजवर अपराजित असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे. वसई विरारमधील तिन्ही जागा हातून गेल्या असून भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे बविआला मोठा झटका लागला आहे. या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. आता बविआची महापालिकेत असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. यासाठी खास रणनिती तयार करण्यात आली आहे. त्यासाठी माजी आमदार विवेक पंडित हे देखील सक्रिय झाले आहेत. त्यांच्या श्रमजीवी संघटनेने महापालिकेत शिरकाव केला असून बविआची सर्व बाजूने कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. नालासोपाराचे आमदार राजन नाईक आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात वसईतील रखडलेले प्रश्न मांडले तसेच बविआने हल्लाबोल करण्यास सुरवात केली आहे. आढावा बैठक घेऊन पालिकेतील प्रशासनावर आपली पकड निर्माण केली जात आहे. यामुळे बविआ बॅकफूटवर गेलेला पहायला मिळत आहे.

हेही वाचा – सतीश प्रधानांच्या ‘त्या’ दीड मतांच्या विजयाने राज्याच्या राजकारणाला कलाटणी

गेल्या ३५ वर्षांपासून वसईत बविआची एकहाती सत्ता होती. त्यामुळे विकास कामे रखडली होती. बविआला सत्तेपासून खेचण्याचे आमचे डावपेच यशस्वी झाले आहेत. आता महापालिकेतूनही बविआला हद्दपार करण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. किमान ७० पेक्षा अधिक जागा मिळवून आम्ही सत्तेत येऊ, असा दावा भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी केला आहे.

लोकसभेची आदिवासींसाठी राखीव असलेली जागा बविआला बोनस असते. २००९ मध्ये बविआचे बळीराम जाधव खासदार झाले होते. त्यानंतर बविआला ही जागा जिंकता आली नव्हती. मात्र लोकसभेची जागा नसली तरी बविआला फारसा फरक पडत नव्हता. यंदा लोकसभेत बविआचा पराभव तर झालाच पण पक्ष तिसर्‍या स्थानावर फेकला गेला होता. परंतु आता पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासह तिन्ही आमदारांचा पराभव झाल्याने पक्षाला मोठा धक्का लागला आहे. पक्षाच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवामुळे बहुजन विकास आघाडीपुढे आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. महापालिकाही हातून गेली की अस्तित्वच संपुष्टात येईल. त्यामुळे आता अस्तित्व टिकवायचं असेल तर कामाला लागण्याचे आदेश बविआच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. लोकांशी तुटलेला संपर्क जोडण्यासाठी लोकांमध्ये जाण्याचा सल्ला वरिष्ठांनी दिला आहे.

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा-संघाचं मिशन मनपा, आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात; मित्रपक्षांबाबत भूमिका काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्गज नेत्यांना उतरविणार

बहुजन विकास आघाडीचे पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेत्यांना महापालिकेत आपल्या वारसांना तसेच तरुण आणि नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विधानसभेतील पराभवाने धोक्याची सूचना दिली आहे. पक्षापुढे पहिल्यांदाच भाजपने आव्हान निर्माण केलं आहे. पक्षाचे नेते राजीव पाटील यांनी बंड मागे घेतलं असलं तरी त्यांची पक्षातील निष्क्रियता धोकादायक मानली जात आहे. मतदारांनी राष्ट्रीय पक्ष बघून लोकसभा आणि विधानसभेला मतदान केलं होतं. परंतु महापालिकेत व्यक्ती पाहून मतदान केलं जाईल असा पक्षाला विश्वास आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांना महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. जीतूभाई शहा, अजीव पाटील, उमेश नाईक, प्रफुल्ल साने, अजय खोखाणी, नारायण मानकर, सगीर डांगे, प्रशांत राऊत, नितीन राऊत, नितीन ठाकूर आदी ज्येष्ठ नेते महापालिकेच्या निवडणुकीत उतरवले जाणार आहेत.