पाकिस्तान आणि शेजारी देशांतून निर्माण होणाऱ्या दहशतवादाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळांचा भाग म्हणून काँग्रेस नेत्यांसह सर्वपक्षीय खासदार परदेशांत गेले आहेत. मात्र, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि सरकारवर सातत्याने टीका करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना नवीन प्रश्न विचारले आहेत आणि भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले असल्याची टीकाही केली आहे. राहुल गांधी नक्की काय म्हणाले? जाणून घेऊ…

राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न

राहुल गांधींनी परराष्ट्रमंत्र्यांचा ‘जेजे’ असा उल्लेख केल्यामुळे भाजपाने या पोस्टवर तीव्र संताप व्यक्त केला. भाजपाने राहुल गांधी यांच्या टीकांना अपरिपक्व आणि बेजबाबदार म्हणत ते ‘निशान-ए-पाकिस्तान’ असल्याचे म्हटले. डच ब्रॉडकास्टर एनओएसला जयशंकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीची क्लिप शेअर करीत राहुल गांधींनी ‘एक्स’वर लिहिले, “जेजे स्पष्ट करतील का : भारताला पाकिस्तानशी का जोडले गेले आहे? पाकिस्तानचा निषेध करण्यात एकाही देशाकडून आपल्याला पाठिंबा का दिला गेला नाही? ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘मध्यस्थी’ करण्यास कोणी सांगितले?”, असे प्रश्न त्यांनी एक्सवर केले.

‘जेजे’चा नेमका अर्थ काय?

काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा व सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांना ‘जेजे’चा अर्थ विचारला असता, त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. दोन वरिष्ठ नेत्यांनी सांगितले, “एक ‘जे’चा वापर जयशंकर यांच्यासाठी करण्यात आला होता; तर दुसरा ‘जे’ हा शब्द जोकर, जयचंद किंवा मीर जाफर म्हणून वापरला गेला असावा. कारण- यापूर्वीही विरोधी पक्षांनी परराष्ट्रमंत्र्यांचा उल्लेख या युगातील जयचंद, असा केला होता. जयचंद किंवा मीर जाफर दोघेही देशद्रोही मानले जातात,” असे एका नेत्याने सांगितले.

काँग्रेस नेतेही राहुल गांधींच्या पोस्टने नाराज?

काँग्रेसच्या दुसऱ्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पक्षाने केंद्रीय मंत्र्याबद्दल असे काही बोलू नये. “सरकार आणि परराष्ट्रमंत्री यांना प्रश्न विचारण्याचा एक चांगला मार्ग असला पाहिजे. मला माहीत आहे की, भाजपानं काँग्रेस आणि राहुल गांधींवर वैयक्तिक हल्ले केले आहेत. पण, आपल्यात आणि त्यांच्यात फरक असला पाहिजे,” असे ते पुढे म्हणाले. सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका नेत्याने सांगितले, “ते विरोधी पक्षनेते आहेत. लोकांच्या वतीने सरकारला प्रश्न विचारण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण, सोशल मीडियावरील अशा पोस्ट मला कळत नाहीत. तुम्ही तुमचे प्रवक्ते आणि नेत्यांबरोबर अशा गोष्टी करू शकता. तुमच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून तुम्ही हे का करता?”

राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्र्यांचे विधान पोस्ट केले आणि लिहिले, “हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला सांगणे हा गुन्हा होता.” राहुल गांधींनी सरकारवर आरोप केले की, सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानला दिली होती. राहुल गांधी यांनी या कृत्याला गंभीर उल्लंघन, असे म्हटले. खेरा यांनी त्याच दिवशी मीडिया ब्रीफिंगमध्ये या आरोपांचा उल्लेख केला आणि म्हटले की, जयशंकर यांच्या या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत झाली असेल. खेरा यांनी मंत्र्यांना ‘मुखबीर (माहिती देणारा)’ असेही म्हटले आणि आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली,” असा प्रश्नही केला. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, जयशंकर यांची वक्तव्ये आणि त्यातील तथ्ये याबाबत केले गेलेले सादरीकरण पूर्णपणे चुकीचे आहे.

“भारताचे विरोधी पक्षनेते आहेत की पाकिस्तानचे निशान-ए-पाकिस्तान”

भाजपाने राहुल गांधींच्या विधानांवर टीका केली आणि म्हटले की, त्यांच्या टिप्पण्यांचा वापर पाकिस्तान भारताला बदनाम करण्यासाठी करीत आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, “तुमचे पंतप्रधानांशी मतभेद असू शकतात, हे लोकशाहीत घडू शकते; परंतु त्यांच्याविरुद्ध अप्रतिष्ठित शब्द वापरणे, तुमच्या विधानांना पाकिस्तानकडून पाठिंबा मिळणे, पाकिस्तानकडून भारताची बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला जाणे आणि तुम्ही शांत राहणे, हे एकूणच चिंताजनक आहे.” ते पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी हे ठरवावे की, ते भारताचे विरोधी पक्षनेते आहेत की पाकिस्तानचे ‘निशान-ए-पाकिस्तान’ आहेत.

“ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असताना, राहुल गांधी कोणत्या प्रकारची बेजबाबदार विधाने करीत आहेत? आज पाकिस्तानच्या ज्येष्ठ राजकीय नेत्या मरियम नवाजही म्हणाल्या की, ६, ७ व ९ मे रोजी रात्री भारताने केलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले आहे,” असे त्यांनी सांगितले. “पाकिस्तान कबूल करीत आहे की, आपल्या सैन्याने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ११ पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त केले. मरियम नवाज कबूल करीत आहेत की, पाकिस्तानचे या हल्ल्यात नुकसान झाले आहे. मात्र, विरोधी पक्षनेते, निशान-ए-पाकिस्तान आता काय करत आहे? तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्वेष करताना देशातील १४० कोटी जनतेचा द्वेष का करू लागलात”, असा प्रश्न गौरव भाटिया यांनी विचारला.

राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्टपूर्वी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केला की, १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तानने कोणत्याही हल्ल्याबद्दल किंवा लष्करी हालचालींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक करार केला होता. त्यांनी पुढे म्हटले की, हा करार काँग्रेसच्या पाठिंब्यानं करण्यात आला होता. दुबे यांनी ‘एक्स’वर, “हा करार देशद्रोह आहे का? काँग्रेस पाकिस्तानी मते मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पण्या करणे तुम्हाला शोभते का,” असे लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या कराराच्या कलम १४ नुसार, १९ ऑगस्ट १९९२ रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा करार मंजूर करण्यात आला होता, जो माझ्या ट्वीटच्या पान क्रमांक २ वर लिहिलेला आहे. १९९२ मध्ये काँग्रेसचे सरकार होते की नाही?,” असे त्यांनी विचारले. “लष्करी सराव, युद्धाभ्यास व सैन्याच्या हालचालींबाबत सूचना देण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील करारावर ६ एप्रिल १९९१ रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील सरकार १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ पर्यंत म्हणजेच एकूण सात महिने चालले. ६ मार्च रोजी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काही महिने सरकार सत्तेत होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले.