पुणे शहरातील मानाच्या पाचही गणपतींची प्रतिष्ठापना पार पडली. विशेष म्हणजे दरवर्षी या सोहळ्यासाठी सकाळपासूनच ढोल-ताशांचा गजर आणि रांगोळ्यांच्या पायघड्या दिसत असत हे दृश्य यावेळी पहायला मिळालं नाही. यंदा करोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागत असून पुणे शहरात एकदम शांततामय आणि सर्व नियमाचे पालन करून मानाच्या गणपतींसह इतर प्रमुख मंडळाचे बाप्पा दुपारी दोन वाजेपर्यंत उत्सव मंडपात विराजमान झाले. तर रस्त्यावर नागरिकांची गर्दी कमी पाहण्यास मिळाली. पुणे शहरातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध असून हा उत्सव पाहण्यास अनेक ठिकाणावरून नागरिक शहरात येत असतात. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून करोना विषाणूमुळे देशभरात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर या काळात आलेले सर्वच सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले गेले. त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या निर्णयाला पुणे शहरातील सर्व मंडळांनी साथ दिली. दरवर्षी, गणरायाच्या आगमनाच्या दिवशी वाजत गाजत बाप्पाचे आगमन होत असत. मात्र, यंदा काही मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळ या सर्व मंडळांच्या बाप्पांची दुपारी दोन वाजेपर्यंत प्रतिष्ठापना झाली. मागील पाच महिन्यांपासून बाप्पाचे दर्शन घेता आले नाही. आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यास आणि त्याची छबी टिपण्यास भाविकांची मंडळाच्या बाहेर एकच गर्दी पाहण्यास मिळाली. तर दरवर्षी पेक्षा यंदा रस्त्यावर गर्दी कमीच पाहण्यास मिळाली.