इंगळे यांचे वाचनही अफाट आहे, इतकेच नाही तर वाचनाची गोडी इतरांनाही लागावी, म्हणून ते सतत झटत असतात. ते स्वत: तर खूप वाचतातच, पण स्वखर्चाने उत्तम पुस्तके आणून ती इतरांना भेट देण्याच्या त्यांच्या छंदामुळे अनेकांना वाचनाची गोडी लागली आहे. आपले अद्ययावत समृद्ध ज्ञानभांडार विद्यार्थ्यांसाठी ते सदैव खुले ठेवतात. कोणत्याही विषयावर ते अत्यंत नेमकेपणाने माहितीपूर्ण भाषण देतात. अनेक विषयावरील त्यांचे प्रभुत्व त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अचंबित करते. सामाजिक संस्थांमधील मुलांना दिवाळीत इंगळे स्वखर्चाने फराळाचे पदार्थ, पुस्तके नेऊन देतात. आपली मुलेबाळे, घरदार यासाठी सगळेच जण जगतात, पण आपल्या घराच्या चौकटीबाहेर देखील एक जग सामावलेले असते, याची जाणीव ठेवून जगणाऱ्यांमध्ये जनार्दन इंगळे यांचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रात, आपल्या शाळेच्या कामातील कोणतेही कार्य असो किंवा विद्यार्थ्यांना शिकवणे असो यापासून त्यांच्या समस्या सोडविण्यापर्यंत सर्वच जबाबदाऱ्या इंगळे अगदी मनापासून पूर्ण करतात. प्रत्येक काम आपलेच आहे ही भावना त्यांची प्रत्येक कार्यात असते. त्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये विशेष रस, मग ती समस्या अभ्यासातील असो अथवा कोणतीही. विज्ञान, गणित आणि गड किल्ले हे त्यांचे आवडीचे विषय. जेथे म्हणून इंगळे यांची गरज लागते, तेथे-तेथे ते लगेच धावून जातात. त्यांची मुलगी पर्णल आणि पत्नी मनीषा या दोघींच्या पाठिंब्यामुळे या सेवाव्रतीचे कार्य अहोरात्र सुरू असते. कामाचा झपाटा, असंख्य ओळखी, मृदु बोलणे, विद्यार्थ्यांशी मित्राप्रमाणे वागणे, कोणत्याही प्रकारे जास्तीचे पैसे किंवा इतर अपेक्षा न ठेवता जादा तास घेणे अशी त्यांच्या गुणांची नोंद. आबासाहेब अत्रे दिन प्रशाला या शाळेच्या प्रशासकीय कामात येणारे प्रश्न असोत, विद्यार्थी अथवा शिक्षक किंवा पालक कोणतीही समस्या असो, विद्यार्थ्यांचे वर्गातील समायोजनाचे प्रश्न असोत, सर्वासाठी ते तितक्याच आत्मीयतेने झटतात. अनेकदा आर्थिक झळ सोसून ते आपले काम करीत राहतात. इंदापूर येथून पुण्यात आलेल्या इंगळे यांनी आपली भाषा प्रयत्नपूर्वक बदलून ‘पुणेरी’ केली पण अंतर्मन मात्र तेच मृदु, स्नेहमय, प्रेमळ ठेवलं आणि पुण्यालाच आपलंसं केलं! तनमन आणि धनाने सेवा करणे म्हणजे काय, हे इंगळे यांच्याशी बोलल्यानंतर जाणवतं पण स्वत:चे गुणगान गाणे, सेल्फ मार्केटिंग करणे, त्यांना पसंतच नाही. इंगळे यांनी आपलं जीवनच ‘राष्ट्राय स्वाहा। इदं न मम।’ म्हणत भाभा अणुशक्ती केंद्रात किरणोत्साराचे परिणाम पाहण्यासाठी शास्त्रज्ञांच्या हाती सोपवलं. पोखरण येथे अणुस्फोटाची भूमिगत चाचणी झाली होती. त्या प्रयोगाबाबतच्या निरोपाची इंदिरा गांधीही वाट पाहत होत्या. त्या महान प्रयोगात जनार्दन इंगळे कच्छच्या वाळवंटात एक साधी खुर्ची घेऊन बसले होते. मानवी शरीरावर त्या भूमिगत अणुस्फोटाचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी ते ‘गिनिपिग’ झाले होते! जाणून बुजून आयुष्यभर अणुशक्तीचे दुष्परिणाम झेलण्याची तयारी दर्शवणाऱ्या या सैनिकाबाबत आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम वैयक्तिक चौकशी करायचे, त्यांची आठवण काढायचे. इंगळे यांनी अनुभवलेल्या घातक किरणोत्साराचे घातक परिणाम होऊन त्यांच्या पाठीचे मणके अकाली निकामी झाल्याने कृत्रिम मणके बसवावे लागले आहेत. त्याच्या वेदनांचा त्रास त्यांना होतोच. या पाठीच्या दुखण्यामुळे खरंतर त्यांना नीट झोपही लागत नाही, पण ही तक्रार जनार्दन इंगळे यांची स्वत:ची नाहीच. त्यांच्या या नि:स्वार्थी सेवेचा आदर ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलामही करीत असत. इथे आल्यानंतर त्यांच्या प्रेरणेने, मदतीने आणि आश्रयाने अनेक मानसपुत्र, आणि कितीतरी मानस भाचे-पुतणे, अन् कितीतरी स्नेही त्यांच्याकडे आले, वर्षांनुवर्षे राहिले आणि शिक्षण घेतले. कित्येकांना तर त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतही त्यांनी केली. अनेकानेक मुलांच्या अडचणीत त्यांना सर्व प्रकारे मदत केली. अनेक शिक्षक, पालक, कर्मचारी, शिपाई असे अनेक त्यांच्या मदतीने उपकृत आहेत. सामाजिक जाणिवेसाठी आपले शरीर वापरायला देण्यामुळे अनेक शारीरिक त्रास झाले इतकेच नाही तर अनेक अपघातांमुळेही त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. पण इंगळे यांच्या मुखातून या त्रासाबद्दल काही येत नाहीच, पण त्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावरही असा भाव कधी दिसत नाही. इतकेच नाही तर पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अव्याहतपणे त्यांचे काम आणि फक्त काम सुरूच असते. शास्त्र, गणित हे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषयही त्यांना समजतील, आवडतील अशा पद्धतीने शिकवण्यात इंगळे यांचा हातखंडा आहे. त्यातही सर्वसामान्य किंवा अतिसामान्य मुलांना शिकवताना तर शिक्षकाच्या कौशल्याची अन् संयमाची कसोटीच लागते. त्यांच्याकडे अशा मुलांची नेहमी रीघ लागते कारण ते न कंटाळता विषय समजेपर्यंत विद्यार्थ्यांला मदत करतात. प्रत्येक कामात त्यांची हीच भूमिका असते. इंगळे यांचे वाचनही अफाट आहे, इतकेच नाही तर वाचनाची गोडी इतरांनाही लागावी, म्हणून ते सतत झटत असतात. ते स्वत: तर खूप वाचतातच, पण स्वखर्चाने उत्तम पुस्तके आणून ती इतरांना भेट देण्याच्या त्यांच्या छंदामुळे अनेकांना वाचनाची गोडी लागली आहे. आपले अद्ययावत समृद्ध ज्ञानभांडार विद्यार्थ्यांसाठी ते सदैव खुले ठेवतात. कोणत्याही विषयावर ते अत्यंत नेमकेपणाने माहितीपूर्ण भाषण देतात. अनेक विषयावरील त्यांचे प्रभुत्व त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अचंबित करते. सामाजिक संस्थांमधील मुलांना दिवाळीत इंगळे स्वखर्चाने फराळाचे पदार्थ, पुस्तके नेऊन देतात. दाता आणि याचक यांच्यामध्ये कायमच खूप मोठे अंतर असते. दात्याच्या मनात अनेकदा आपण दिल्याची भावना जोर धरू लागतो आणि त्याचे रूपांतर अहंकारात होऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला घेणाऱ्यावर ते घेण्याची वेळ विविध कारणांमुळे आलेली असते. या सगळ्या परिस्थितीमध्ये काही वेळा घेणाऱ्याच्या मनात लाचारीची भावना देखील निर्माण होऊ शकते. पण जर दात्याची भावना शुद्ध असेल, तर घेणारा देखील घेण्याचे ओझे न मानता केवळ परिस्थितीमुळे ते घेतो, पण त्या घेण्यातही त्याची परतफेडीची जशी भावना असते, तशीच गरजवंताला मदत करण्याची देखील. म्हणजेच एकाची सद्भावना दुसऱ्याच्याही मनात चांगलेच भाव उत्पन्न करते, अशा प्रकारे सेवाकार्य कसे करायचे यासाठी इंगळे यांच्यासारख्या व्यक्तींचा आदर्श घेऊन वाटचाल करायला हवी. shriram.oak@expressindia.com