राज्यात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. पण आपल्याला बोगस मतदान रोखण्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करण्याची वेळ आल्यास आतापासूनच बुथ प्रमुख म्हणून टगे ठेवले पाहिजे. असा अजब सल्ला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यात बोलताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

पुण्यात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाश्चिम महाराष्ट्राचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक तसेच कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्षानुवर्षे निवडणूक लढवित असल्याने, त्या कशा जिंकायच्या त्या बद्दल त्यांना डावपेच कसे आख्याचे हे माहिती आहे. पण आता आपण देखील बर्‍यापैकी शिकलो आहोत, त्यामुळे बिहारमध्ये येणार नाही येणार नाही,असे म्हणत होते. पण आपण आलोच ना, तेलंगणा मध्ये आलो आहे. त्यामुळे आपण देखील कशात कमी नसल्याचे त्यांनी सांगितले.