करोना कालावधीत कचरा संकलनाचे काम अव्याहतपणे

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वर्षभरापूर्वी करोना विषाणू संसर्ग झपाटय़ाने वाढल्यानंतर शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले. नव्या विषाणूने सर्व सामान्य नागरिकांच्या मनात धडकीच भरविली असतानाही शहरात स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मात्र धोका पत्करून केवळ सामाजिक भावनेतून करोना कालावधीतही अव्याहतपणे कचरा संकलनाचे काम सुरू ठेवले. अनेक अडथळ्यांवर मात करीत, वेळप्रसंगी घर बदलण्याची तयारी ठेवत, कधी पायी प्रवास करत करोना कालावधीत कचरा संकलनाचे काम स्वच्छ सेवकांनी निष्ठेने केल्याचे दिसून आले.

करोना विषाणूचा संसर्ग शहरात सुरू झाल्यानंतर शहरात नियमित दिसणारे चित्रच अचानक बदलले अन् घरोघरी जाऊन, सोसायटय़ा, वस्त्यांमधील कचरा संकलन करणाऱ्या स्वच्छ सेवकांच्या मनताही धाक धूक सुरू झाली. पण शहरातील कचरा वेळेत उचलला गेलाच नाही तर? करोना विषाणूच्या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर आरोग्याचे किती प्रश्न निर्माण होतील, ही जाणीव स्वच्छ संस्थेतील सेवकांना झाली आणि करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावातही शहर स्वच्छतेचा वसा घेऊन कामाचे नियोजन स्वच्छ संस्थेकडून आले.

स्वच्छ सहकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करून, त्यांना अल्पावधीतच प्रशिक्षण दिल्यानंतर साडेतीन हजार कर्मचारी शहर स्वच्छतेच्या सेवेला लागले. करोना विषाणूचा सांसर्गिक आजार रोखण्यात या स्वच्छता दूतांचाही वाटा मोलाचा ठरत आहे. नागरिक हेच मालक या भावनेतून स्वच्छ संस्थेचे कर्मचारीही काम करत असल्यामुळे सद्य:स्थितीमध्येही शहर स्वच्छ राहत असल्याचे चित्र आहे.

कचरा संकलनाची सेवा नियमित सुरू असतानाच शहरात करोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. नागरिकांमध्ये घबराट पसरली, गोंधळ उडाला. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरात टाळेबंदी लागू झाली. याशिवाय संचारबंदी, जमावबंदी, खासगी वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली. त्यामुळे साहजिकच स्वच्छतेचे सेवक असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही गोंधळ उडाला.

घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम हे कर्मचारी करत असल्यामुळे करोनाचा संसर्ग होतो की काय, या भीतीने स्वच्छ सेवकांनाही घेरले. त्यामुळे प्रारंभी कर्मचारी स्वच्छतेच्या कामासाठी पुढे आलेच नाहीत. त्यातच बंदीचा कालावधी हा कमी राहील, असाही अंदाज होता. हा कालावधीही वाढला तशा कर्मचाऱ्यांपुढील अडचणीतही वाढ झाली. कचरा सेवकांना सोसायटय़ांमध्ये येण्यास मज्जाव सुरू झाला. काही ठिकाणी त्यांना असंवेदनशील वागणूकही मिळू लागली. तर कधी वाहने बंद असल्यामुळे सेवा पुरविण्यात अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होण्याची भीती वाढू लागली. पण सामाजिक जाणीव, नागरिक हेच आपले मालक आणि स्वच्छ, सुंदर शहर हेच आपले कार्य या भावनेतून साडेतीन हजार कर्मचारी पुन्हा एकदा उभे राहिले.

घरोघरी जाऊन कचरा संकलन होत असल्यामुळे या सेवकांना काही वेळा विचित्र वागणूकही मिळाली. बिबवेवाडी येथील स्वच्छच्या महिला सेविके ला घरमालकाने घर सोडण्यास सांगितले. काही कचरा सेवकांनी करोना लढतीमध्ये त्यांना मिळालेला मोबदलाही महापालिके कडे दिला. स्वच्छ सेवेकांनी निष्ठेने के लेल्या कामाला नागरिकांनीही सत्कार करून सलाम ठोकला. भीतीदायक वातावरण असतानाही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छ सेवकांची कामावरील अभंग निष्ठा शहरात कौतुकाचा विषय ठरली.

करोना संसर्ग काळात सेवकांशी सातत्याने संवाद ठेवण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांना माहिती देण्यात आली. सुरक्षा साधनेही पुरविण्यात आली. करोना काळात सेवकांचे काम किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्यात आले. सेवकांनीही सामाजिक भान ओळखून जबाबदारी स्वीकारली आणि यशस्वी करून दाखविली.

– हर्षद बर्डे, अध्यक्ष, स्वच्छ सेवा सहकारी संस्था