पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यातील पहिला करोनाग्रस्त रुग्णही पुण्यात आढळला होता. त्यामुळे पुणे आणि आजूबाजूच्या परिसरावर राज्य सरकारवर विशेष लक्ष ठेवून आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून शैक्षणिक संस्थांसह अनेक गोष्टी बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, या बंदच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारनं काही गोष्टींना सुट दिली आहे. नागरिकांना सेवा देताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विशेष सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढलेल्या आदेशात दिली आहे.

पुण्यातूनच करोनाच्या विषाणूनं महाराष्ट्रात शिरकाव केला. दुबईला फिरण्यासाठी गेलेल्या ग्रुपमधील लोकांमुळे राज्यात करोना पटकन पसरला. त्यानंतर मुंबई, नागपूर या शहरात करोनाचे रुग्ण आढळून आले. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधिताचा आकडा ४५ वर पोहोचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण पिंपर-चिंचवड आणि पुण्यात आहेत. त्यामुळे पुण्यात प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. लोकांची वर्दळ असणारी ठिकाण बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.

काय राहणार सुरू?

शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाची कार्यालये.

अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब.

सर्व प्रकारचे वैद्यकीय नर्सिंग महाविद्यालये.

रेल्वे स्थानक, बस स्थानक, महानगर परिवहन थांबे आणि स्थानक, विमानतळ, रिक्षा थांबे.

अत्यावश्यक किराणा सामान, दुध/दुग्धोत्पादन विकणारी दुकानं, फळे व भाजपाला, मेडिकल, जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यास मूभा.

सर्व हॉटेल/लॉज चालकांना आरोग्यविषयक खबरदारी घेऊन ग्राहकांना खाद्य पदार्थ बनवून देण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यार्थी खानावळ तसेच महाविद्यालये, वसतिगृहांमधील मेस परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवता येणार.

प्रसारमाध्यमांची (दैनिक, नियतकालिक, वृत्तवाहिन्या) कार्यालये सुरू राहतील.