पुणे महापालिका दरमहा सव्वा टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरते, असा आक्षेप पाटबंधारे विभागाने घेतला असून हा आक्षेप महापालिकेने फेटाळून लावला आहे.
महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पाणीवापराबाबत नेहमीच वाद होतो. तसाच प्रकार पुन्हा एकदा झाला आहे. महापालिकेने २२ ते २८ एप्रिल दरम्यान किती पाणीवापर केला त्याबाबतची माहिती संकलित करून पाटबंधारे विभागाने महापालिका जादा पाणी वापरत असल्याचा आक्षेप एका पत्रातून नोंदवला आहे. या माहितीवरून महापालिका मंजूर केलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी वापरत आहे, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. महापालिकेने प्रतिमहा सव्वा टीएमसी पाणीवापराचे नियोजन करावे, असेही या पत्रातून सूचित करण्यात आले आहे. महापालिकेने मात्र हा आक्षेप फेटाळला असून गेल्या वर्षभरात पाणी पुरवठा योजनेसाठीचा वीजवापर ६३ लाख युनिटने कमी झाला आहे. तसेच पाणीयोजनेचे वीजबिलही कमी आले आहे. त्यामुळे मंजूर प्रमाणापेक्षा जादा पाणी घेतलेले नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.