आयटीत काम करणाऱ्या मंडळींची वाढती संख्या आणि पुण्याची एकूणच ‘कॉस्मोपॉलिटन’ शहर म्हणून बदलत चाललेली ओळख, यामुळे शहराच्या भाजीबाजारावरही परिणाम दिसू लागला आहे. शहरात विदेशी भाज्यांना असलेली मागणी गेल्या काही वर्षांत लक्षणीय रीत्या वाढली असून दर महिन्याला या भाज्यांची तब्बल साठ ते ७५ टनांहून अधिक उलाढाल होत असल्याचा अंदाज काही भाजी पुरवठादारांनी वर्तवला आहे. वेगवेगळ्या रंगांच्या ढोबळ्या मिरच्या, बेबीकॉर्न, स्वीट कॉर्न, ब्रोकोली, मशरूम्स, जांभळा कोबी, आइसबर्ग लेटय़ुस, चेरी टोमॅटो या भाज्यांना शहरात चांगली मागणी आहे. याबरोबरच सालासकट खाता येण्याजोगे मटार (स्नो पीज्), अॅस्पॅरॅगस, आर्टीचोक, जालापेनो मिरच्या, झुकीनी (विदेशी काकडी) या भाज्यांही हळूहळू लोकप्रिय होत असल्याची माहिती भाजी पुरवठादारांनी दिली. सर्व विदेशी भाज्यांची किंमत पाव किलोला सुमारे पंचवीस ते पन्नास रुपये आहे. स्नो पीज् सारख्या काही भाज्या तर दोनशे ग्रॅमला सुमारे नव्वद रुपये अशा दरातही उपलब्ध आहेत. तरीही त्यांची मागणी कमी झालेली नाही. विशेष म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि शॉपिंग मॉल्सबरोबरच पुरवठादारांकडून या भाज्या खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रमाणही वाढले आहे. या भाज्यांच्या महिन्याच्या उलाढालीत २५ टक्के वाटा थेट खरेदी करणाऱ्या नागरिकांचा असल्याचे पुरवठादारांनी सांगितले. भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या पुण्यातील ‘ग्रीन टोकरी’ या संस्थेच्या वाणिज्य व्यवस्थापक पद्मजा दवे म्हणाल्या, ‘‘पुण्यात आयटीमध्ये काम करणारी लोकसंख्या मोठी आहे. परदेशी राहिलेल्या मंडळींना या भाज्यांची चांगली ओळख झाली असल्याने त्यांच्याकडून भाज्यांना मोठी मागणी असते. दर महिन्याला ग्रीन टोकरीतर्फे सुमारे २० हजार किलो परदेशी भाज्यांचे उत्पादन केले जाते. पुण्याबरोबरच या भाज्या मुंबई, उटी, दिल्ली, उत्तरांचल, उदयपूर, कोलकाता येथेही पुरवल्या जातात. घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांबरोबरच संकेतस्थळावरूनही भाज्यांची विक्री केली जाते.’’ ग्रीन टोकरीतर्फे जांभळ्या रंगाची भेंडी नव्याने बाजारात आणली असल्याचे दवे यांनी सांगितले. या भाज्या जेनेटिकली मॉडिफाईड नसून परदेशातून बिया आणून त्यांची लागवड करत असल्याचे त्या म्हणाल्या.पर्यटनाच्या हंगामात या भाज्यांची मागणी वाढत असल्याचे ‘रश्मी ग्रीनलँड’ या पुरवठादार संस्थेचे मालक रश्मीकुमार अब्रोल यांनी सांगितले. दिवसाकाठी सुमारे दोन ते अडीच टनांहून अधिक विदेशी भाज्यांची पुण्यात उलाढाल होत असल्याचे ते म्हणाले.‘इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रीसर्च’च्या माहितीनुसार परदेशी भाज्यांपैकी सुमारे ८५ टक्के भाज्या आयात केल्या जातात. देशात या भाज्यांची उलाढाल दर वर्षांला १५ ते २० टक्क्य़ांनी वाढत आहे.