‘समाजात हिंसाचार आणि धार्मिक उन्माद मानसिक संसर्गजन्य आजार असल्यासारखाच पसरतो आहे. हा हिंसाचार ज्याप्रमाणे अठरा महिन्यांपूर्वी आमच्या घरामध्ये आला, चार दिवसांपूर्वी पानसरे कुटुंबाच्या घरामध्ये आला तसाच तो प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरात येऊ शकतो. त्यामुळे समाजाच्या मनाला ग्रासत असलेल्या या रोगांच्या विरोधातही लढा द्यावा लागणार आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. ‘के. बी. उर्फ अण्णा तळवलकर स्मृती प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा ‘समाज शिक्षक पुरस्कार’ ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दाभोलकर बोलत होते. संस्थेतर्फे दिला जाणारा ‘एक्झेम्प्लरी इंडस्ट्रिअॅलिस्ट पुरस्कार’ उद्योजक सुभाष चुत्तर यांना, तर ‘सेवाव्रती पुरस्कार’ ‘स्वयंम्’ या संस्थेच्या नीता देवळलकर यांना प्रदान करण्यात आला. राजीव देवळलकर, संस्थेचे श्रीकांत कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.दाभोलकर म्हणाले, ‘‘समाजात हिंसाचार आणि धार्मिक उन्माद मानसिक संसर्गजन्य आजार असल्यासारखाच पसरतो आहे. हिंसाचार हा एक मानसिक आजार असून त्याची मुळे व्यापक सामाजिक व राजकीय परिस्थितीत आहेत, असे १५- २० वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. हा हिंसाचार ज्याप्रमाणे १८ महिन्यांपूर्वी आमच्या घरामध्ये आला, ४ दिवसांपूर्वी पानसरे कुटुंबाच्या घरामध्ये आला तसाच तो प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरात येऊ शकतो. धार्मिक असहिष्णुतेचाही एक मोठा मानसिक आजार समाजात पसरतो आहे. आपल्याला न पटणारे एखादे मत दुसरी व्यक्ती मांडत असेल तर त्याचा मत मांडण्याचा अधिकार मान्य करण्याऐवजी त्या व्यक्तीलाच संपवून टाकण्याची प्रवृत्ती समाजात मोठय़ा प्रमाणावर मूळ धरु लागली आहे.’’ मानसिक आरोग्याचा प्रश्न व अपंगत्वाचा प्रश्न हे समाजातील दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले असल्याचे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘सार्वजनिक महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर व्यवस्था कोणतेही उत्तरदायित्व मानायला तयार नाही. राज्यात प्रत्येक जिल्ह्य़ात एक मनोविकार तज्ज्ञ नेमण्याइतकी पायाभूत गरजही शासन पूर्ण करु शकत नाही. अपंग व मतिमंद व्यक्तींचे पुनर्वसनही मेणबत्त्या आणि आकाशकंदील बनवण्यापर्यंतच मर्यादित राहते. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनावर अवलंबून न राहता समाज व शासनाला बरोबर घेऊन चालणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची गरज आहे. रुग्ण व त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे गट बांधणेही गरजेचे आहे.’’चुत्तर यांनी ६८ विशेष मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कारखान्यात इतर कामगारांप्रमाणेच काम करायला शिकवले आहे, तर नीता देवळलकर यांची ‘स्वयम्’ ही संस्था ‘स्पॅस्टिक’ बालकांसाठी काम करते.