सीमेपलीकडील शत्रूकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. मात्र देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह्य़आक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला.

पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’(भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संस्थेच्या आवारात देशांतर्गत सुरक्षा या विषयावर या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जात आहे. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. परिषदेच्या पहिल्या सत्रात शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

तंत्रज्ञानातील बदल, त्या अनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मोदी यांनी भाष्य केले.

देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सीमेपलीकडील शत्रूकडून देशांतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. मात्र देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नसून आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह्य़ आक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम असल्याचे यावेळी मोदी यांनी नमूद केले.

तीन दिवसांच्या या परिषदेची सांगता रविवारी (८ डिसेंबर) होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह १८० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी परिषदेत उपस्थित आहेत.