दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष उफळला आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड केली जात आहे, तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढी टोकाची भूमिका केंद्र सरकारने घेऊ नये, शेतकर्यांबद्दल जी चुकीची भूमिका घेतली असेल त्याचा मी धिक्कार करतो. असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकारपरिषेदत बोलताना अजित पवार म्हणाले, “ते एकदम आंदोलन करत नाही. ते पहिल्यांदा सांगतात की, या आमच्या मागण्या, आमची ही भूमिका आहे. तर त्या संबधित राज्यकर्त्यांनी लक्ष घालण्याची गरज असते. पण दिल्ली येथील आंदोलन हे आजचे नसून दीड महिन्यापासून सुरू आहे. त्या दरम्यान दहा-बारा बैठका झाल्या. पण त्या निष्फळ ठरल्या आहेत. त्यावर त्यांनी २६ जानेवारी रोजी आम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत, असं सांगितलं. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी खबरदारी घ्यावी लागते. कुठेही गडबड होता कामा नये. याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. त्या ठिकाणी अश्रूधुरांचा वापर का करावा लागला? हे समजायला मार्ग नाही. माझ एक शेतकरी म्हणून स्वतःच मत आहे की, शेतकर्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना न्याय दिला गेला पाहिजे. एवढी टोकाची भूमिका केंद्र सरकारने घेऊ नये. शेतकर्यांबद्दल जी चुकीची भूमिका घेतली असेल, त्याचा मी धिक्कार करतो. तसेच आम्ही शेतकर्यांच्या बाजूने आहोत, हे मी काल पण सांगितले, आजपण सांगतो आणि उद्या देखील हेच सांगेल.” आणखी वाचा- दिल्लीतील वातावरणं बिघडलं, त्याला अहंकारी सरकारच जबाबदार – संजय राऊत दरम्यान, दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपाचे पोलिसाचं जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे, असंही ढवळे यांनी म्हटलं आहे.