|| राहुल खळदकर, प्रदीप नणंदकर, 

व्यापाऱ्यांनाही मोठी झळ; निर्णयावर नाराजी

पुणे/ लातूर: हमीभावाने डाळींची विक्री सुरू असतानाच गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने डाळींच्या आयातीवर निर्बंध हटविल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांनाही मोठी झळ बसणार असून सरकारने आयातीवरील निर्बंध मागे घेण्याचा निर्णय अनाकलनीय असल्याची टीका व्यापारी तसेच शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.

बाजारपेठेत मूग आणि हरभरा डाळींची हमीभावापेक्षा कमी भावाने विक्री केली जात आहे. तूर आणि उडीद या डाळींचे दर हमीभावाच्या आसपास आहेत. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना पहिल्यांदाच हमीभावाने डाळींची विक्री करता आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले होते. करोनामुळे बाजारपेठांमधील व्यवहारांवर परिणाम झाला होता. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी शेतीमालाची विक्री करण्याच्या तयारीत असताना अचानक गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने डाळींच्या आयातीवरील निर्बंध मागे घेतले. केंद्र सरकारने आयातीवरील निर्बंध मागे का घेतले, यामागचे कारण न समजल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वास्तविक हमीभावापेक्षा पन्नास टक्के भाववाढ झाली तर सरकारकडून हस्तक्षेप केला जातो, असे धोरण असताना अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान होणार आहे. हरभऱ्याचे हमीभाव केंद्र बंद करण्यात आले आहे. इंधन महाग झाल्याने वाहतूक खर्च वाढलेला आहे. हमीभावापेक्षा मूग क्विंटलमागे सुमारे चौदाशे रुपये आणि हरभरा डाळ पाचशे रुपये कमी भावाने विकण्याची वेळ शेतक ऱ्यांवर आलेली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

परदेशातील शेतक ऱ्यांना पायघड्या

डाळींच्या भावात दरवाढ झाल्याच्या वृत्तामुळे सरकारने आयातीवर निर्बंध हटविल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून भाव स्थिरावत असताना सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगण्यात आले. डाळवर्गीय पिके  हवामानावर अवलंबून असतात. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी डाळवर्गीय पिकांची लागवड करण्यापासून परावृत्त होतील. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गेल्या वर्षभरापासून सार्वजनिक कार्यक्रम, विवाह समारंभावर निर्बंध आहेत. डाळींना मागणी नेहमीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत डाळींच्या दरात फार मोठी वाढ होणार नव्हती. सरकारने डाळ आयातीवरील निर्बंध मागे घेऊन विदेशातील शेतकऱ्यांना पायघड्या घातल्या आहेत, अशी टीका लातूर डाळमिल असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद कलंत्री यांनी केली.

पंतप्रधानांना पत्र

महाराष्ट्र डाळमिल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गोयल (नागपूर) आणि सचिव नितीन कलंत्री (लातूर) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. केंद्र सरकारने शेतक ऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डाळ आयातीवर निर्बंध मागे घेतल्याने आत्मनिर्भर प्रक्रियेला खीळ बसेल, अशी प्रतिक्रिया गोयल आणि कलंत्री यांनी व्यक्त केली आहे.

 डाळींच्या दरात घट

डाळ आयातीवरील निर्बंध हटविल्यानंतर उडीद, तूरडाळ, मूगडाळ, चणाडाळीच्या दरात घट झाली. चणाडाळीच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपये, उडीद डाळीच्या दरात किलोमागे सात ते आठ रुपये, मूगडाळीच्या दरात पाच रुपये, तूरडाळीच्या दरात पाच रुपयांनी घट झाली. डाळींचे भाव स्थिरावले असताना अचानक डाळ आयातीवरील निर्बंध मागे घेतल्याने सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात घट झाली आहे. केंद्र सरकारने गरज नसताना आयातीवर निर्बंध मागे घेतले, असे मार्केटयार्डातील पोपटलाल धनराज दुगड पेढीचे कवीश दुगड यांनी सांगितले.