लोणावळ्यातील हॉटेल कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर मृतावस्थेत सापडलेल्या अल्पवयीन मुलीचा खून हॉटेलमधील खोलीतच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खून केल्यानंतर तिचा मृतदेह लपविण्यासाठी तो टेरेसवर सोलर पॅनलच्या खाली टाकण्यात आला असल्याचेही आता उघड झाले आहे. या प्रकरणी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असले, तरी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
संबंधित मुलगी तिच्या कुटुंबासोबत मागील रविवारी हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यासाठी आली होती. मात्र त्या दिवशीच ती बेपत्ता झाली. दोन दिवसांनी हॉटेलच्या टेरेसवर सोलर पॅनलखाली तिचा मृतदेह सापडला. खुनापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी हॉटेलची तोडफोड केली. विवाह सोहळ्यासाठी हॉटेलात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या खोलीची तपासणी केली असता, या खोलीमध्ये मोठय़ा प्रमाणावर रक्त आढळून आले. ते रक्त खून झालेल्या मुलीचेच असल्याचे रक्ताचे नमुने तपासल्यानंतर उघड झाले. त्यामुळे मुलीचा खून तिच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी दिलेल्या खोलीतच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना हॉटेलमधील कर्मचारी व बाहेरून केटिरगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली व त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. घटनेनंतर हॉटेलमधील काही कर्मचारी गावाला केले आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठीही पोलीस पथक पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, हॉटेलमध्ये विवाह सोहळा सुरू असताना रात्री नऊच्या सुमारास एक लहान मुलगी प्रवेशद्वाराजवळ रडत बसली होती तसेच दोन महिला व तीन पुरुष तिला ओढत बाजूला घेऊन जात असल्याचे आपण पाहिले असल्याची माहिती एका तरुणाने पोलिसांना दिली आहे.
मुख्यमंत्रीही ‘त्या’ हॉटेलमध्ये आले होते
कुमार रिसॉर्ट हे लोणावळ्यातील मध्यवर्ती भागातील महत्त्वाचे हॉटेल आहे. मात्र, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मुलीचा खून होण्याच्या घटनेच्या आठ दिवस अगोदर याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. मुख्यमंत्रीही ज्या हॉटेलात येतात तेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसने ही बाब सुरक्षेचे िधडवडे काढणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, जयपूर दिल्ली आदी भागांतील अनेक उच्चभ्रू कुटुंबातील विवाह सोहळे या हॉटेलमध्ये होत असतात. विवाह सोहळ्यातून अचानक एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होते व दोन दिवसांनी तिचा मृतदेह हॉटेलच्याच टेरेसवर सापडतो, हा सर्व प्रकार सुरक्षा यंत्रणेच्या हजगर्लीपणामुळेच घडला असा आरोप नागरिकांनी केला.