पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिंगरोड यासारखे पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास सर्वच महत्त्वाचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. शहरात अघोषित भारनियमन सुरू आहे. कचरा व्यवस्थापनाचे नियोजन नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. गुन्हेगारी वाढली असून पालिकेतील भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, नाना काटे आदी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असणारा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील काळेवाडी ते पिंपरीचा मोर्चा शनिवारी (७ ऑक्टोबर) होणार आहे, त्याचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे सर्व नेते मतभेद विसरून एकत्र आले व त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.

केंद्र व राज्यसरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत महागाई प्रचंड वाढली. पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. सर्वच आघाडय़ांवर भाजप अपयशी ठरले आहे. तीन वर्षांच्या काळात भाजप नेत्यांच्या एकेक थापा उघडकीस येत आहेत. जीएसटी, नोटाबंदी फसली आहे. देशाचा विकासदर घटला आहे. शेतक ऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी आहे. शेतक ऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. कामगार धोरणाचा खेळखंडोबा झाला आहे. सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे, असे आरोप राष्ट्रवादी नेत्यांनी केले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue in pimpri chinchwad ncp pcmc
First published on: 07-10-2017 at 05:24 IST