मोसमी पाऊस (मान्सून) शनिवारी अंदमान समुद्रात तसेच, सर्व निकोबार बेटे आणि काही अंदमान बेटांवर दाखल झाला. या भागात त्याचे नियोजित वेळापत्रकानुसार चार दिवस आधीच आगमन झाले आहे. विशेष म्हणजे तो पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती असल्याने तो येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात पुढे सरकण्याची शक्यता आहे.
मान्सूनचे अंदमानातील आगमन वेळेआधी झाल्याने तो ३० मेपर्यंत केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांतील वादळी पावसामुळे कमाल तापमानात घट झाली. विदर्भातही शनिवारी दुपारी पारा ४० अंशांच्या आसपास किंवा खालीच होता. राज्यात मालेगाव येथे सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.