लग्नामध्ये भरपूर पैसे खर्च केले जातात. पण, नात्यामध्ये भावनिक गुंतवणूक करतो का, असा प्रश्न उपस्थित करीत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी, नात्यामध्ये भावनिक गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी लिहिलेल्या ‘तो-ती’ या पुस्तकाचे प्रकाशन मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ‘बुकगंगा’तर्फे हे पुस्तक ई-बुकवर नेण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी संदीप खरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध लेखक प्रा. मििलद जोशी, बुकगंगाचे मंदार जोगळेकर आणि प्रकाशिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर या वेळी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ आणि वृषाली पटवर्धन यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या,की नात्यामध्ये दैनंदिनी म्हणून आपण मिसळतो. पण, आपण टीपकागदासारखे एकमेकांत मिसळून गेलो आहोत का याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांना सहवास आणि सहजीवनासाठी वेळच नाही हे आजचे वास्तव आहे. अशा जोडप्यांना विचार करायला लावण्याचे डोळ्यांत अंजन घालण्याचे काम हे पुस्तक करते. नव्या पिढीमध्ये आलेला नात्यातील मोकळेपणा सगळ्यांनाच सुखावह वाटत आहे. मात्र, व्यक्तीच्या अधिकारांमध्ये आलेला मोकळेपणा आल्यास अतिरेक होऊन नाते दुरावण्यास सुरूवात होते. हे टाळण्यासाठी नात्यातील मोकळेपणा सहन करण्याची वृत्ती स्वीकारली पाहिजे. संदीप खरे म्हणाले,की नात्यातील गुंतागुंत उलगडणारे लेखन हा नवा प्रवाह या पुस्तकाच्यानिमित्ताने मराठी वाङ्मयामध्ये सहभागी झाला आहे. हे पुस्तक आपल्यावरच लिहिले आहे असे निखळपणे वाटल्यानंतर पटते. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे लख्ख प्रतििबब दाखविणारा आरसा आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नात्यांचा सूत्रबद्ध आलेख मांडणाऱ्या या पुस्तकातून नाते प्रगल्भ कसे करायचे याचे मार्गदर्शन मिळते, असे मििलद जोशी यांनी सांगितले. सुधीर गाडगीळ म्हणाले,‘‘आयुष्यात आजवर भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या आणि त्यांच्यातील नात्यांचा बंध, गुंतागुंत, जुळणे-तुटणे याचा मागोवा या पुस्तकातून घेतला आहे. गेल्या ४५ वर्षांपासून आयुष्यातील प्रत्येक घटना मी डायरीमध्ये नोंदवून ठेवत असल्याचा उपयोग मला झाला.’’ मििलद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.